औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून घरातून निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल सहा महिन्यांनी सापडला आहे. त्याच्या कुटूंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याप्रकरणी पोलिसात मिसींग दाखल केली होती. सर्वत्र शोधाशोध करुन देखील त्याचा तपास लागत नव्हता. अखेर सहा महिन्यानंतर गावापासून दिड किलोमिटर अंतरावर त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सहा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र रंगनाथ इंगळे (34) याचा तो मृतदेह असल्याची खात्री झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला. शनिवार 24 जुलै 2021 रोजी दौलताबाद परिसरातील केसापुरी गावात त्याचा मृतदेह आढळून आला. राजेंद्रचे कुजलेल्या अवस्थेतील शव झाडाला लटकलेल्या अवस्थेत होते. पायातील बुटांवरून त्याची ओळख पटवण्यात यश आले.
केसापुरी गावातील एक शेतकर रामपुरी तांड्यातील डोंगरावर बकऱ्यांना चराईसाठी गेला असता त्याला हा मृतदेह आढळून आला. त्याने या घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना दिली. उंच डोंगराच्या खोल कपारीत हा मृतदेह असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या मदतीने हा मृतदेह काढण्यात आला. उपस्थित जमावाने तो राजेंद्र असल्याचा संशय व्यक्त केला होता. राजेंद्रच्या भावांनी घटनास्थळी आल्यावर त्याच्या उर्वरीत हाडांवरुन तसेच कपडे व बुटांवरुन तो राजेंद्र असल्याचे उघड झाले. मयत राजेंद्रचा मृतदेह शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आला. 19 फेब्रुवारी घरगुती रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या राजेंद्रचा मृतदेह आढळून आल्याने त्याचे कुटूंबीय मोठ्या प्रमाणात आक्रोश करत होते.
