जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी

On: March 30, 2022 8:46 PM

जळगाव : भारतातील प्रथम क्रमांकाच्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सूक्ष्मसिंचन प्रणाली उत्पादन करणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने 29 मार्च 2022 ला झालेल्या सर्व कर्जदारांच्या संयुक्त सभेत ‘कर्ज निराकरण योजना’, 10 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मास्टर रिस्ट्रक्चरींग अ‍ॅग्रीमेंटनुसार काही अटींची पूर्तता केल्यावर मंजूर व जाहीर करण्यात आली. ही कर्ज पुनर्रचना पूर्ण झाल्यावर कंपनीच्या सर्व कर्जदारांनी कंपनीच्या कर्ज सुविधा सामान्य केल्या असून मागील काळातील सर्व अनियमितता, निष्क्रियता दूर केल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेने 7 जून 2019 ला विशिष्ट धोरण असलेल्या (संपत्तीच्या) कर्ज निराकरणासाठी धोरणपूर्वक मांडणी जाहीर केल्यानंतर या कर्ज निराकरण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेला आयसीआरए आणि क्रिसिल या संस्थांनी RP-4 रेटींग दिले आहे. कंपनीच्या सगळया सुरक्षित कर्जदारांनी या योजनेस संमती दिल्यामुळे ही कर्ज निराकरण योजना आकारात आली आहे. विविध राज्य सरकारांकडील कंपनीस येणारी येणी मिळण्यास उशीर झाल्याने खेळत्या भांडवलास अडचण येत होती आणि यामुळेही या कर्ज फेडीला उशीर ही होत होता. कंपनीच्या कर्जनिराकारण योजनेची पूर्तता झाल्याने या सर्व अडचणींचे निराकरण होणार आहे.

एकत्रित निराकरण झालेल्या कर्जाची रक्कम अंदाजे 3878 कोटी रूपये झाली आहे. संपूर्ण कर्जाच्या 40 टक्के कर्ज अपरिवर्तनीय कर्जरोख्यांमध्ये 0.01 टक्के व्याजावर परिवर्तीत करण्यात आले आहे. प्रवर्तकांनी कंपनीत काही रक्कम आणणे मान्य केले होते. त्यानुसार त्यातील 267 कोटी रूपयांपैकी 40 टक्के रक्कम आधीच आणलेली आहे. प्रवर्तक उरलेली रक्कम येत्या काही महिन्यांत कंपनीत भरतील. कर्जदारांना 7.89 कोटी रूपयांचे साधारण समभाग यामध्ये दिलेले आहेत. या काळात कंपनीने विदेशातील 200 दशलक्ष डॉलर्स रकमेच्या कर्जरोख्यांची पुनर्रचना केली आहे. या कर्ज निराकरण योजने संदर्भात कंपनी सविस्तर माहिती या आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेबतपासणी व लेखा परीक्षण झाल्यानंतर जाहीर करणार आहे.

कर्ज निराकरण योजनेमुळे कंपनीवर होणारा सकारात्मक परिणाम व कामगिरी
या योजनेमुळे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ला रू. 300 कोटींची अतिरिक्त खेळत्या भांडवलासाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे, यासह कंपनीच्या कर्जावरील व्याजात मोठी घट होणार आहे. तसेच कर्जदारांना अधिक कालावधीत द्यायची रक्कम आणि कंपनीचा निधी प्रवाह (फंड फ्लो) सुरळीत होऊन कंपनीच्या कामकाजात आणि कामगिरीत संपूर्ण सुधारणा होईल.


“स्टेट बँक ऑफ इंडिया हया कर्जदारांच्या समूहातील अग्रगण्य बँक आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हे कंपनीच्या सगळया भागधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एकत्रीत काम करत आहेत. या कर्जनिराकरण योजनेच्या सुरूवातीपासून ते अंमलबजावणीपर्यंतचा कालावधी फार कठिण होता. तथापि सगळया भागधारकांची श्रद्धा, आणि कर्जदारांचा व्यवस्थापनावर असलेला विश्वास यामुळे प्रत्येक घटकाच्या प्रयत्नांने कंपनीला व व्यवस्थापनाला ही कर्ज निराकरण योजना (रिझोल्युशन प्लॅन – आरपी) यशस्वीपणे अमलात आणता आली. – ”अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment