हमीद तडवी याजकडून
रावेर : रावेर तालुक्यात गेल्या ४ – ५ महिन्यांपासुन खाजगी फायनान्स कंपन्याच्या प्रतिनिधींनी आपल्या कर्जदार ग्राहकांकडे कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीचा सारखा तगादा लावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कर्जदार वैतागले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीक हातावर हात धरुन बसले आहेत. तशातच या वसुलीच्या तगाद्याने कर्जदारांचा फायनान्स कंपन्या व त्यांच्या वसुली करणा-या प्रतिनिधींवर रोष आहे.
वास्तविक लॉकडाऊन काळात आरबीआय ने सुरवातीला मार्च ते मे अशी तीन महीने ईएमआयला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा तिन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्याकाळात खाजगी फायनांस कंपन्यांनी इएमआय वर अवाढव्य व्याज आकारत हप्ते वसुली सुरुच ठेवली असल्यचे लोक उघडपणे बोलत आहेत.
सहा महिन्यांसाठी कर्ज वसुलीसाठी मुदत वाढ मिळाली असली तरी या कालावधीतील कर्जावर व्याज आकारु नये अशी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल असुन त्याचा निकाल बाकी आहे. या बिकट परिस्थितीत काही खाजगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी अरेरावीची भाषा वापरत सक्तीने वसुली केल्याचे लोक खुले आम बोलत असून तशी कर्जदारांची ओरड आहे.
सध्या लॉकडाऊन पुर्णपणे उघडले नसून काही अंशी बंदच आहे. त्यामुळे उद्योगधंदे पुर्ण स्वरुपात सुरु झालेले नाहीत. त्यामुळे अजून काही महिने तरी ईएमआयला स्थगिती मिळावी तसेच या कालावधीतील व्याज माफ व्हावे अशी ग्रामिण भागातील कर्जदारांची रास्त मागणी आहे.