आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नितीन विसपुते यांचा सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) :  येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राला “व्यसनाधिन रुग्ण मित्रांसाठी सर्वोत्कृष्ट एकात्मिक पुनर्वसन केंद्र” म्हणून केंद्र सरकारच्या वतीने विशेष पुरस्कार नुकताच देण्यात आला. 26 जून रोजी नवी दिल्ली येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनी आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने संचालक नितीन विसपुते व चेतना विसपुते यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय परिसंवाद आणि पुरस्कार कार्यक्रम अंतर्गत संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नशामुक्त भारत अभियान अंतर्गत हा सन्मान करण्यात आला आहे. संबंधित व्यसनमुक्ती क्षेत्रात आणि सामाजिक जबाबदारीत गेल्या वर्षभरात दाखवलेल्या एकूण उत्कृष्टतेवर आधारित असून हा पुरस्कार राष्ट्रीय व्यासपीठावर देण्यात आला आहे. पुरस्कार देतांना आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह पॅलेस्टाईनचे राजदूत सेब्रतो उपस्थित होते. कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. ओमराजे निंबाळकर, खा. राजाभाऊ वाजे, आयुष इन्स्टिट्यूटचे संचालक संदीप तांबारे, इंटिग्रेटेड अचिवर्सच्या संचालिका जुही सबरवाल, डॉ. राहुल सूर्यवंशी व डॉ. प्रशांत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजात वाढत चाललेले पदार्थाचे व्यसन ही फार मोठी समस्या आपल्या देशासमोर उभी आहे. आज चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र अमली पदार्थांच्या व्यसनांना आळा घालण्यासाठी मोठे योगदान देत आहे. शाळा कॉलेज येथे जाऊन विद्यार्थांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगण्याचे महत्वाचे काम डॉ. नितीन विसपुते व चेतना विसपुते हे चेतना  व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून करत आहेत.  आजपर्यंत दहा हजारांहून अधिक रुग्ण मित्र व्यसनमुक्त झाले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, आ. राजुमामा भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here