जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

जळगाव दि.16 प्रतिनिधी – विकास आणि विकासात्मक वाटचाली कडे मार्गक्रमण होण्यासाठी ड्रीप, स्प्रिंकलर्स, पाईपसह आधुनिक तंत्रज्ञान कंपनीतर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. कंपनी आता अधिक संशोधनावर भर देणार असून शेतकऱ्यांना परिवर्तनशील होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा व जैन सौलर कृषी पम्प बाजारात पुर्नप्रस्थापीत केले जाईल. टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातही सकारात्मक बदल केले जात आहेत. सध्या व्यवसायांमध्ये मशिन लर्निंग व एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे. शेतीत मशीन लर्निंग (एमएल) आणि आर्टिफिशीयल इंटिजलेन्स (एआय) कसे वापरावे याचा विचार करुन संशोधन केले जाणार आहे. भविष्याचा वेध घेवून शेतीत परिवर्तनाच्या माध्यमातून उन्नती साध्य होणार आहे. सकारात्मक बदल होऊन अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. त्यादृष्टीने जैन इरिगेशन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. असे मनोगत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्लास्टिक पार्कच्या पटांगणात झाली. याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, शिषीर दलाल, घन:श्याम दास, नॅन्सी बॅरी, डॉ. एच. पी. सिंग, चीफ फायनान्शिअल ऑफिसर बिपीन वलामे, कंपनीचे सेक्रेटरी ए. व्ही. घोडगावकर व संचालक मंडळ तसेच जैन फार्मफ्रेश फूडचे संचालक अथांग जैन व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. सभेला भागभांडवलदार, सहकारी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेची सुरुवात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘नमन करो ये भारत है’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. रायसोनी मॅनेजमेंट आणि अनुभूती निवासी स्कूलचे विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण सभेत कामकाज अनुभवले. अन्मय जैन यांच्यासह विद्यार्थ्यांनी तयार केलेले ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर केले. सभेच्या कामकाजाच्या सुरवातीला वर्षभरात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील वर्षाचे लेखाजोखा पत्रक, नविन संचालकांची नियुक्त आणि निवृत्ती यासह आठ ठराव सर्वानुमूते पारित करण्यात आले.

या सभेत स्वतंत्र संचालक घन:श्याम दास व डॉ. एच. पी. सिंग, राधिका दुधाट यांची निवृत्ती जाहिर करण्यात आली. तर त्यांच्या जागी शिषीर दलाल व अशोक दलवाई यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. तर जॉनेस्ट बास्टीयन, नॅन्सी बॅरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूकीची घोषणा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते निवृत्त संचालक डॉ. एच. पी. सिंग, घन:श्याम दास यांचा स्मृतीचिन्ह व आठवणीतला अल्बम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

यावेळी मनोगतात डॉ. एच. पी. सिंग यांनी सांगितले की, ‘भावना प्रेम आणि शक्ती जिथे असेल तिथे ईश्वराची प्राप्ती होते. भवरलालजी जैन यांना त्यांच्या कार्यातूनही प्राप्त झाली. त्यामुळेच ते शेतकऱ्यांसाठी ईश्वर ठरले. जो पर्यंत भूक लागेल तोपर्यंत शेतीतून उत्पादन घेतले जाईल सोबतच मूल्यवर्धित सेवा घडत राहिल. त्यामुळे शेतकरी सुखी तर आपण सुखी ही मोठ्याभाऊंची भावना पुढील पिढीवर संस्कारीत झाली आणि हा विचार प्रेरणादायी ठरला. यातूनच जैन इरिगेशनशी भावनिकरित्या ऋणाबंध जोपासल्याचे’ डॉ. एच. पी. सिंग म्हणाले.

‘शिस्त, गुणवत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावहारिक पारदर्शकतेमुळे जैन इरिगेशनशी जुळलो. कृषी क्षेत्रात खूप आव्हाने आहेत मात्र शाश्वत लक्ष्य ठेवले तर त्यातही मोलाचे योगदान देता येऊ शकते. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देता येऊ शकते.’ असे मनोगत घन:श्याम दास यांनी व्यक्त केले.

मान्यवरांच्या उपस्थित जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञान व उत्पादनांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी Jains Connect हे कंपनीशी सर्वांना जोडणारं अॅप लॉच करण्यात आले. जैन इरिगेशनच्या  संकल्प गीत चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. आभार अतुल जैन यांनी मानले.राष्ट्रगिताने समारोप झाला.

सौर कृषि पंप विभाग नव्याने कार्यान्वितअनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्यांच्याशी जुळन राहण्यासाठी सौर कृषी पंप विभागाची नव्याने सुरवात करण्यात येणार आहे. ठिबक, तुषार, पाईप हे व्यवसाय तर आहेत. त्याच्या जोडीला सौर कृषी पंपाची जोड महत्त्वाची ठरणार आहे. कृषी पंप व अपारंपारिक ऊर्जा यांचा सुरेख संगम घडवून त्यामाध्यमातून कंपनीचा महसूल वाढविण्याचा विचार ही व्यक्त केला. जगात २.५ मिटर इतक्या मोठ्या व्यासाचा पाईप जैन इरिगेशनद्वारे निर्माण केला होतो. डिस्लॅनिशेन प्रकल्पांमध्ये शंभर वर्ष टिकणारा हा पाईप भविष्यातील व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here