जळगाव : गुरे चोरणा-या चौघा चोरट्यांना पोलिस वाहनातून नेत असतांना दोघा चोरट्यांनी शिताफीने पळून जाण्याची संधी साधली. या घटने प्रकरणी चौघा पोलिस कर्मचा-यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोहेकॉ. संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील, राहुल कोळी अशी निलंबनाची कारवाई झालेल्या चौघा एलसीबी कर्मचा-यांची नावे आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश काढले आहेत.
अमळनेर व जामनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या चौघा चोरट्यांना 22 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे नेले जात होते. वाटेत अमळनेर येण्याआधी लागणा-या रेल्वेच्या अंडरपासजवळ वाहनाचा वेग कमी झाला. वाहनाचा वेग कमी झाल्याची संधी साधून चौघांपैकी दोघा चोरट्यांनी हातातील बेड्यांसह पलायन केले. शाकीर शाह अरमान शाह (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) व अमजद शेख फकीर कुरेशी (रा. मेहरूण परिसर, जळगाव) अशी पळून गेलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
रेल्वेने तयार केलेल्या या अंडरपासच्या असंख्य तक्रारी आहेत. या अंडरपासमधे नेहमी पाणी साचलेले असते. या पाण्यात दुचाकी वाहनधारकांचा तोल जावून पडण्याची भिती असते. त्यामुळे या अंडरपासमधून जातांना विशेषत: दुचाकी वाहनधारकांना खुप काळजी घ्यावी लागते. या ठिकाणी सर्वच वाहनांचा वेग कमी होतो. या अंडरपासमधून जातांना पलीकडून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे सारखा हॉर्न वाजवावा लागतो. या अंडरपासमधून जाणे म्हणजे एक दिव्य म्हटले जाते. त्याचाच गैरफायदा पळून जाणा-या चोरट्यांनी घेतला.






