जीवरक्षक ओम पाटीलच्या शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन करणार पुर्ण

On: March 24, 2026 8:33 PM

जळगाव, दि.२४ (प्रतिनिधी) :   पोहता येत नसतानाही अनेर नदीत स्नानासाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 )  हा देवदूत ठरला आहे. ओमच्या या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्यात येणार आहे. तसेच ओम पाटील याचा अतुलनीय धाडसाबद्दल अशोक जैन यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे .

अनेर नदीत गणपूर ( चोपडा ) येथील चार अल्पवयीन मुले ( वय 16 )  आंघोळीसाठी उतरले होते. परंतु या चौघांनाही पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. त्याचवेळी तिथून जात असलेल्या ओम पाटील याने नदीतील डोहात उडी घेऊन चारही मुलांचे प्राण वाचवून ओम त्यांच्यासाठी देवदूत ठरला आहे. ओम हा गावातील विकास विद्यालयात 8 वी च्या वर्गात शिकत असून गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे. ओमचे वडील रवींद्र पाटील आणि आई सारलाबाई हे शेतमजुरी करतात. प्लॉट एरियात त्यांचे पत्र्याचे घर असून मोठा मुलगा 11 वीचे शिक्षण घेत आहे. परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेताना मुलांना अडचणी येत आहेत. आज माध्यमात ओम यांच्या धाडसाचे आलेले वृत्त पाहून जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाचले. त्यानंतर ओम याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येण्यात असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

“संपत्तीच्या गरजेपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज सर्वात जास्त गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या या विचारांचा वारसा जैन परिवारावर आहे. संस्कारशील विचारांचा आधार या कार्याला आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जैन इरिगेशन कायमच अशा मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.” अशोक जैनअध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment