जळगाव : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करुन देखील ते येत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या सुमारे अडीच महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचारी संपात उतरले आहेत. राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याची अर्थात महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे.
राज्य मार्ग परिवहन विभागाच्या जळगाव विभागातील अजून 22 कर्मचाऱ्यांना आज बडतर्फ करण्यात आले आहे. जळगाव आगारातील 8 व भुसावळ आगारातील 14 कर्मचाऱ्यांचा या बडतर्फीत समावेश आहे. आतापर्यंत एकूण 350 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव आगारातील 35 चालक व 35 वाहक कामावर हजर झाले असले तरी त्यांची सेवा अतिशय तोकडी पडत आहे. राज्य शासनाने बस कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह इतर मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर झाला असून प्रवाशांनी इतर पर्याय निवडले आहेत. यामुळे खासगी प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात फोफावली असून खासगी प्रवासी सेवा देणा-या व्यावसायिकांची मात्र चांदी झाली आहे.