मुंबई : बँकेच्या खातेधारकांची वेळोवेळी होणारी फसवणुक, सातत्याने होणा-या ऑनलाईन गुन्हयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या फसवणूकीमुळे आर्थिक नुकसान होते. ऑनलाईन फसवणूकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची नियमावली आणली आहे. या नियमावलीमुळे ग्राहकांना स्वत:च्या बँक खात्याचे रक्षण करता येणार आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षा आणि जागरुकतेसाठी ‘सायबर दोस्त’ नावाच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारच्या सूचना देण्याचे काम सुरु केले आहे.
बॅंक ग्राहकांनी त्यांच्या बॅंकींग कामासाठी वेगळे व नेहमीच्या कामासाठी वेगळे ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तने दिला आहे. ग्राहकांनी ‘नेहमी दोन वेगवेगळी ई-मेल खाती वापरण्याचे आवाहन या दोस्तच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यातील एकाचा वापर तुमच्या विश्वासातील व्यक्तींसोबत संवाद साधण्यासाठी व दुसऱ्याचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करा. सोशल नेटवर्किंग साईट्ससाठी वेगळे ई-मेल खातं वापरा असेही या सायबर दोस्तने म्हटले आहे. असे केल्यास तुमची फसवणूक टळेल.ऑनलाईन फसवणूक करणारे ई मेलच्या माध्यमातून ग्राहकांना आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याची, क्रेडिट कार्ड्सची माहिती देऊन आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळेच सरकारने सायबर दोस्तच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्याच्या सुरक्षेसाठी विविध टिप्स अर्थात सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी वापरात असलेल्या ई-मेल खात्याचा सोशल मीडियावर उल्लेख न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विविध वेब ब्राऊजर्स वापरत असतांना त्यात सीव्हीव्ही, एक्स्पायरी डेट, कार्ड नंबर, बँक खाते क्रमांक अशी महत्वाची माहिती स्वत: टाईप करा. त्यासाठी ऑटो-फिलचा पर्याय निवडू नका असे त्यात म्हटले आहे.