जमावाच्या मारहाणीत दोघे भाऊ मृत्युमुखी, एक गंभीर

जालना : जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यात घडली आहे. जालना तालुक्यातील पानशेंदरा शिवारात भर दिवसा ही घटना घडली. या घटनेमुळे पानशेंदरा गावात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

पोळ्याच्या दिवशी पानशेंद्रा येथील बोर्डे बंधूंचा गावातील काही लोकांसोबत वाद झाला होता. याप्रकरणी तालुका जालना पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी बोर्डे बंधूंचा गावकऱ्यांसोबत त्या वादातून भांडण झाले. बघता बघता या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत होण्यास वेळ लागला नाही. संतप्त जमावाने लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने बोर्डे बंधूंवर बेदम मारहाण सुरु केली. या बेदम मारहाणीत राहुल बोर्डे (25) याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी प्रदीप बोर्डे (23) याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. तिसरा भाऊ रामेश्वर बोर्डे (30) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित केली. याप्रकरणी 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here