जळगाव : जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे गेल्या तीन वर्षापासुन वितरण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गात नाराजी पसरली आहे. या बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचीत झाले असून या प्रकरणी चौकशीची मागणी शालेय व्यवस्थापन समिती सदस्या शितल जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सचीव यांनी सदर शिष्यवृत्तीच्या अडीच लाख रुपयांचा अपहार केला असल्याचा आरोप शितल जाधव यांनी केला आहे.
गेल्या महीनाभरात अवघ्या दहा ते बारा विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचे वितरण करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. शिष्यवृत्ती आली नसतांना या कथित रकमेचे वितरण कसे काय झाले असा देखील प्रश्न शीतल जाधव यांनी उपस्थित केला आहे. फत्तेपूर येथील सेंट्रल बँकेत या समितीचे संयुक्त खाते आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्याची मागणी जाधव यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.