जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील (सरसेनापती वैद्य चौक) तापी पाटबंधारे महामंडळाचे अतिक्रमण या वर्षाच्या अखेरीस निघण्याची घटीका समीप आल्याचे म्हटले जात आहे. येत्या 15 दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी तापी महामंडळाला दिले आहे. तापी महामंडळाने अतिक्रमण काढले नाही तर महामार्ग प्राधिकरण ते अतिक्रमण काढणार आहे. याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी मनपा आणि जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवला. त्याचे फलीत म्हणून जिल्हाधिका-यांनी आदेश दिला आहे. तसेच तापी महामंडळाचे अतिक्रमण आहे यावर शिक्कामोर्तब देखील झाले आहे.
आकाशवाणी चौकातील तापी पाटबंधारे विकास महामंडळ, विश्रामगृहाचे कुंपण भिंतीचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकात सिन्हा व वाघुर धरण जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन उपस्थित होते.
सदर बैठकीत आकाशवाणी चौकातील तापी पाटबंधारे विकास महामंडळ व विश्रामगृहाच्या कुंपण भिंतीचे बांधकाम राष्ट्रीय राजमार्गाच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय राजमार्ग कायद्यातील उपभाग 2 आणि भाग 26 अंतर्गत अनाधिकृत बांधकाम काढण्या बाबत संबंधित विभागास सुचित करण्यात आले. येत्या 15 दिवसात तापी महामंडळाने आपल्या हद्दीत संरक्षण भिंत बांधून अतिक्रमण काढायचे आहे.