भवरलाल जैन यांच्या कार्याच्या सकारात्मक लहरी शेतकऱ्यांना कायमच प्रेरणादायी – डॉ. अशोक दलवाई

जळगाव दि.२८ प्रतिनिधी –  भारतीय कृषी क्षेत्रात नैसर्गिक संसाधनाचे जतन करून अधिकाधिक फलोत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मजूरांचा अकार्यक्षम वापर वाढत आहे. यामुळे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. भवरलाल जैन यांनी शेती आणि शेतकऱ्यांना कायमच महत्त्व दिलं आणि त्याअनुषंगाने त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या विधायक कार्याच्या सकारात्मक लहरी आजही इथं अनुभवायास मिळतात. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गानेच शेतकऱ्यांची सेवा केली. नवनवीन प्रयोग करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न केला. भगवान महावीर यांच्या  श्रद्धा, ज्ञान आणि वर्तन या त्रिसुत्रीवर भवरलाल जैन यांनी आपले आयुष्य समर्पित केले. असे  प्रतिपादन केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी राष्ट्रीय फलोद्यान परिषदेच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचा रविवारी (ता.२८) प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेत देशातील १०० शास्त्रज्ञ बारा आयसीएआर केंद्रांचे संचालक सहभागी झाले आहेत. 

उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग, इस्त्राईल येथील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल,  इस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष  डॉ. एच. पी. सिंग, माजी सनदी अधिकारी तथा कृषितज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्युचर अग्रीकल्चर लीडर्स इन इंडिया (फाली) च्या संचालिका नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. एम. मिश्रा, जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, उत्तर बंगा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधता येतो, त्या दिशेने जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ८० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल केला आहे. नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. या पुढील काळात शेतीसाठी ड्रोन, सॅटेलाईट, स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर व्हायला हवा. यासह तरुणाईने देखील शेतीमध्ये सामर्थ्यांने पुढे यायला हवे, असे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.

डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन झाले. प्रास्तावीक डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. यात त्यांनी कृषिक्षेत्रातील भविष्यातील उद्दिष्टे विशेषत: फळबागांमध्ये संशोधन आणि विकास यावर भर देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असल्याचे सांगितले. नॅन्सी बॅरी, डॉ. इंद्रमणी मिश्रा, डॉ. एस. के. चक्रवर्ती, डॉ. मेजर सिंग, डॉ. ए. आर. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘शोध चिंतन-२०२३’ या शोधप्रबंधाची १५  वी आवृत्ती, सारांश पुस्तक, मागील वर्षातील इतिवृत्त व सीडी यांचे  प्रकाशन करण्यात आले. डॉ. विशाल नाथ यांनी आभार मानले. गुरूवंदना दिपक चांदोरकर यांनी सादर केली. डॉ. सुब्रम्हन्या यांनी सूत्रसंचालन केले.

माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी  मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जैन इगिरेशनसारख्या संस्था भविष्यातील शेतीचे मंदीर किंवा मार्गदर्शक आहेत. कृषी क्षेत्रातील समस्यांना पर्याय उपलब्ध करून देत आहेत. प्लास्टिकचा योग्य वापर करून शेतीला कसा लाभ मिळू शकतो, याचेही उत्तम उदाहरण जैन इरिगेशनमध्ये दिसते. रसायनांचा बेसुमार वापर झाला आहे. हरित क्रांतीनंतर ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. पुढे पर्यावरण पूरक काम व्हायला हवे. धोरणकर्त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले. शेतीसमोरील संकटे दूर करण्यासंबंधीचे संशोधन बांधावर पोचायला हवे. असे मत माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेत व्यक्त केले.

यावेळी चाईतर्फे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चाई ऑनरड फेलो-२०२३ या पुरस्काराने नवीदिल्ली येथील डीएआरई आणि डीजी आयसीएआरचे सेक्रटरी डॉ. हिमांशू पाठक यांचा सन्मान करण्यात आला. लाईफ टाईम अॅच्युमेंट अॅवार्ड- २०२३ ने डॉ. मेजर सिंग, चाई लाईफ टाईम रिक्यनुशेन अॅवार्ड डॉ. बलराज सिंग, चाई  अॉनररी फेलो डॉ. बिजेंद्र सिंग, प्रो. अजित कूमार कर्नाटक, निर्मल सिडचे डॉ. जे. सी. राजपूत यांनी सन्मानित करण्यात आले.

अमित सिंग मेमोरियल फाऊंडेशन अॅवार्डने बबिता सिंग यांनी फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहिर केले. त्यात अमित कृषी ऋषी अॅवार्डने श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा त्यांनी केलेल्या कृषिक्षेत्रातील कार्याला अधोरेखित करून गौरव  करण्यात आला. हा पुरस्कार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांनी स्वीकारला. अमित पद्म जागृती अॅवार्ड हा निर्मल सिड्स प्रा. लि. ला मिळाला तो जे. सी. राजपूत यांनी स्वीकारला. अमित प्रभुध मनिषी अॅवार्ड उदयपूरच्या एमपीयूएएटीचे कुलगुरू प्रो. अजितकुमार कर्नाटक यांना देण्यात आला. दरम्यान तांदलवाडी ता. रावेर येथील प्रगतीशील शेतकरी राजाराम गणू महाजन यांना रामनंदन बाबू या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला. यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना जैन इरिगेशन कंपनीची शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी स्पष्ट करून सांगितले. 

डॉ. एन. कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पहिले तांत्रिक सत्र पार पडले. या सत्रात उपाध्यक्ष म्हणून केरळचे डॉ. के. निर्मलबाबू, डॉ. एम. फिजा अहमद काम बघितले. संमेलनाचे आयोजक म्हणून जैन इरिगेशनचे डॉ. बाळकृष्ण यादव, तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या डॉ. एच. उषा नंदिनीदेवी यांनी जबाबदारी पार पाडली. डॉ. एच. पी. सिंग यांचे उपजिवका, पोषणद्रव्ये आणि पर्यावरणीय बदल यातून फळबागांचे लागवड व व्यवस्थापन यावर सादरीकरण झाले. इस्त्राईलच्या अॅम्नोन ओफेन यांनी भारत आणि इस्त्राईल यांच्यातील कृषी आणि सिंचन क्षेत्रातील सहकार्य याविषयी सादरीकरण केले. इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल यांनी लसूणाच्या संशोधनाविषयी माहिती दिली.

अल्प संसाधने वापरून जास्तीत जास्त फळबागांमधून उत्पादन घेण्यासाठी दुसऱ्या सत्रात विचारमंथन करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष सुरजीत चौधरी ह्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर डॉ. हर्षवर्धन चौधरी आणि विनोद आनंद यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सत्राचे आयोजक म्हणून त्रिचीच्या एनआरसीबी चे डॉ. पी. सुरेश कुमार आणि डॉ. विनोद कुमार यांनी कार्य केले. या सत्रात मेजर सिंग, अरविंद कुमार, बलराज सिंग, जय सिंग परिहार यांनी फळबागातील पिकांसाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग, प्रिसीजन अॅग्रीकल्चर, ग्रीनहाऊस तंत्रज्ञान, भौगोलिक माहितीचा फळबागांसाठी उपयोग यावर सादरीकरण झाले. तर तिसऱ्या सत्रात पपईची उत्पादकता आणि दर्जा सुधारण्यासाठी अचूक तंत्रज्ञान, संसाधनांचा कार्यक्षम वापरासाठी उपाय, फळबागांमधील सेन्सर वापरून फलोत्पादनाचे व्यवस्थापन, किसान ड्रोनचा शेती वापर यावर सादरीकरण झाले. या परिषदेसाठी आयसीएआरचे केळीचे संचालक डॉ. सेव्हाराजन, डॉ. घोष (नागपूर), डॉ. टी. दामोदरण (लखनौ), माजी कुलगुरू डॉ. एनकुमार यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी भाग घेतला

केळी व बटाटा पिकावर आज कार्यशाळा – राष्ट्रीय फलोत्पादन परिषदे दरम्यान उद्या दि. २९ मे ला ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये केळी उत्पादकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे सचिव के. बी. पाटील यांनी केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here