पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या निर्णयानुसार मंदीर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरचे विठ्ठल मंदीर सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले. त्यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ कार्यकर्त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.
विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले. राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्यासाठी सरकारने दहा दिवसांची मुदत मागून घेतली. या कालावधीत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी आंबेडकरांना दिली. दहा दिवसांत नियमावली झाली नाही तर पुन्हा मंदीरात यावे लागेल असा इशारा आंबेडकर यांनी दिला. मात्र आज मंदिर समितीनेच 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर उघडणार नसल्याचा निर्णय घेतला.