मुंबईतील गेट वे ऑफ़ इंडीया येथून एलिफंटाच्या दिशेने जाणा-या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने मागच्या बाजूने दिलेल्या जोरदार धडकेत मृतांचा आकडा वाढला आहे. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेत आतापर्यंत एकुण तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधे दहा नागरिकांसह नौदलाच्या तिन कर्मचा-यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई जवळ समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ दुपारी चार वाजेच्या सुमारास निलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने हा मोठा अपघात घडला. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे या अपघाती घटनेतील 101 जणांना सुरक्षीतरित्या वाचवण्यात यश आले आहे. मात्र तेरा जणांचा मृत्यु झाला आहे. या तेरा जणांमधे दहा नागरिक आणि तिन नौदल कर्मचा-यांचा समावेश आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नौदल, तटरक्षक दल आणि पोलिस, अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून बचाव कार्य वेगाने सुरु असून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार असून नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाणार आहे.








