45 लाखांच्या खंडणीसाठी इसमाचे अपहरण – एलसीबीच्या कारवाईत दोघे जेरबंद

जळगाव : 45 लाख रुपयांच्या खंडणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील इसमाचे अपहरण करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांना पुढील तपासकामी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या बारा तासांच्या आत अपहरणकर्त्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अपह्रत इसमास जखमी अवस्थेत लासलगाव जंगलातून ताब्यात घेण्यात आले.

चाळीसगाव तालुक्याच्या वाघले येथील रहिवासी गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण झाले होते. या अपहरण प्रकरणी 30 मे 2025 रोजी त्यांचा मुलगा अनिल राठोड याने अनोळखी इसमाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. गणेश राठोड यांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ त्यांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या मुलाला पाठवला जात होता. तसेच व्हाईस कॉल करुन त्यांना 45 लाख रुपयांची खंडणी देखील मागीतली जात होती.

या घटनेत गणेश राठोड यांचे नेमके कुठून अपहरण झाले आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. या गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. तांत्रीक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे जयेश दत्तात्रय शिंदे (रा. सैनिक कॉलनी चाळीसगांव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव जि.नाशिक) या दोघांची नावे निष्पन्न करण्यात आली. दोघे जण मौजे मोझर्ण ता. नांदगाव परिसरात असल्याची खात्रीलायक बातमी पोलिस पथकाला समजली. त्यानंतर अधिकच्या तपासात दोघे आरोपी मनमाड रेल्वे स्टेशनकडे मोटार सायकलने जात असल्याची माहिती समजली. पोलिस पथकाने दोघांच्या मोटार सायकलचा पाठलाग केला असता दोघांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल जागीच सोडून रस्त्यालगतच्या शेतात पलायन केले. पोलिस पथकाने त्यांचा सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे राहणारा त्यांचा मित्र जनार्दन बाळु आवारे उर्फ राजु पाटील व सोनु भाऊ या दोघांच्या सांगण्यावरुन गणेश राठोड यांचे अपहरण केल्याची कबुली दिली.

अपह्रत गणेश ताराचंद राठोड यांना चाळीसगांव तालुक्यातील पाटणा गाव परिसरातील एका शेताच्या शेडमधे डांबून मारहाण करण्यात आली होती. त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ त्यांच्याच मोबाईलवरुन त्यांचा मुलगा अनिल राठोड यांना पाठवला जात होता. तसेच व्हाईस कॉल करुन 45 लाख रुपयांची खंडणी देखील मागीतली जात होती. त्यानंतर अपह्रत गणेश राठोड यांना जखमी अवस्थेत लासलगाव येथील जंगल परिसरात सोडून दोघांनी पलायन केले. मात्र पलायन करत असतांना पोलिस पथकाने दोघांना जेरबंद केले. दोघांना पुढील तपासकामी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे, हे.कॉ. संदीप पाटील, मुरलीधर धनगर, पोकॉ महेश पाटील, पोकॉ सागर पाटील, पोकॉ भुषण शेलार, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, चालक दिपक चौधरी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here