घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – आर्णी केळापूरचे आमदार प्रा. राजू नारायण तोडसाम यांना अपात्र करण्याबाबतची उच्च न्यायालयात दाखल याचिका नागपूर खंडपिठात फेटाळण्यात आली आहे. या निर्णयामुळे आ. तोडसाम यांना दिलासा मिळाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रजनीकांत डालुराम बोरेले व निता आनंदराव मडावी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ही याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायमुर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी ही याचिका १८ जुलै २०२५ शुक्रवार रोजी फेटाळून लावली. याचिका कर्ता रजनीकांत बोरेले यांची बाजू ॲड. अमोल पाटील यांनी मांडली. महाराष्ट्र शासन निवडणूक आयोगातर्फे राज्य निवडणूक आयोग मुंबई, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ, उप विभागीय अधिकारी तथा ८० निवडणूक निर्णय अधिकारी केळापूर व आर्णी केळापूरचे आमदार प्रा. राजू नारायण तोडसाम आदींच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती.
याचिका कर्ता रजनीकांत बोरेले यांचे वकील ॲड. अमोल पाटील यांनी युक्तीवाद केल्यानंतर, सदरच्या याचिकेतील मुद्दे चांगले आहे. मात्र, याचिका वेगळ्या प्रकारे दाखल करावयास पाहिजे होती, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या वेळी याचिका कर्ताचे वकील ॲड. अमोल पाटील यांनी याचिका क्रंमाक WP/3515/2025 मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागितली. त्यानुसार सदर याचिका मागे घेण्यात आली. म्हणून आर्णी केळापूरचे आमदार प्रा. राजू नारायण तोडसाम व निवडणूक आयोग विरुद्धची दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या मुळे आमदार प्रा. राजू तोडसाम यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. याचिका कर्ता रजनीकांत बोरेले यांची बाजू ॲड. अमोल डी. पाटील यांनी मांडली.







