यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यात येणार आहे.१३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने निलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन होत आहे.
न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील ॲड. डी. पी. बोरसे, घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. निलेश चवरडोल, सचिव ॲड. शुभम धुमाळ, माजी अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, माजी सचिव ॲड. सादीक खान, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप नरसाळे, पोलीस उप निरीक्षक, जमादार, पोलीस कान्स्टेबल आदी यावेळी उपस्थित राहणार आहे.
प्रलंबित तडजोडीस पात्र प्रकरणे, निगोशिऐबल ईन्स्ट्रुमेंट ॲक्ट चेक बांउस व इतर प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीची विज बिल प्रकरणे, मालमत्ता विवाद प्रकरणे आदी यावेळी सादर केली जाणार आहेत. ‘देशासाठी मध्यस्ती’ या घोषवाक्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यातील न्यायालयात ही मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार असल्याचे न्यायमूर्ती पाटील यांनी सांगितले आहे.







