जळगाव : दोन परिवारातील वादाने हिंसक वळण घेतल्याने झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यु तर अकरा जण जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथे घडली. एकनाथ निंबा गोपाळ (55) असे मरण पावलेल्या प्रौढाचे नाव आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलवाडी येथे घडलेल्या या घटनेत एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. जखमींवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघा परिवारातील नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार बिलवाडी येथील गोपाळ आणि पाटील या दोघा परिवारामधे जुना वाद आहे. या वादातून गोपाळ यांच्या कुटूंबातील एकाची मोटार सायकल पाटील परिवारातील सदस्याने अडवली होती. यावेळी दोघा परिवारात शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र त्यानंतर आज या घटनेने हिंसक वळण घेतले. या घटनेत लाकडी दांडके, फावडा, आदींचा वापर करण्यात आला.
एका गटातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे – किरण देविदास पाटील (28), मिराबाई सुभाष पाटील (45), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (40), दीपक ज्ञानेश्वर पाटील (23), संगीता रोहिदास पाटील (40). दुसऱ्या गटातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे – जनाबाई एकनाथ गोपाळ (55), एकनाथ बिलाल गोपाळ (35), गणेश एकनाथ गोपाळ (23), भिमराव एकनाथ गोपाळ आणि कमलेश प्रमोद पाटील.






