टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात – शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

On: February 19, 2026 9:01 PM

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी): जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी जैन फार्म फ्रेश फूड्स लि.आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टोमॅटो पीक परिसंवाद’ आयोजित करण्यात आला होता. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे मुडी रोडवरील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वसंत पाटील यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो उत्पादन वाढवण्यासाठी हा परिसंवाद मार्गदर्शक ठरला.

परिसंवादात टोमॅटो रोपांची योग्य निवड, पूर्व मशागत, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन, फर्टिगेशन आणि ऑटोमेशन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या परिसंवादात सिक्कीम येथील कृषी विद्यापीठातील फलोत्पादन विषयाच्या 20 कृषी अभ्यासकांची ही उपस्थिती होती.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचे दैवत बळीराजा आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वल करण्यात आले. 

कागोमे इंडिया प्रा. लि. चे कृषितज्ज्ञ कल्पेश पाटील यांनी बदलते हवामान आणि उत्पादकता याबद्दल मार्गदर्शन केले. योग्य निगा, बेसल डोस, माल्चिंग आणि फळांची साईज या बद्दल शेतकऱ्यांना समजावून सांगितले. जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांनी तांत्रिक सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, खते व पाण्याचे काटेकोर नियोजन करणे यासोबतच जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. उच्च कृषी तंत्रज्ञान वापरून भरघोस उत्पादन घेण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले. यावेळी श्रीराम पाटील यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधून कांदा, टोमॅटोचे पीक घ्यावे याबाबत सांगितले.

कार्यक्रमाला कागोमे इंडिया प्रा. लि. जपानचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख हेंनरीज शिमुकावा यांनी मार्गदर्शन केले. कागोमे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलन चौधरी यांनी त्यांच्या भाषणाचे अनुवाद केले. खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन टोमॅटो व्हरायटी देत आहोत. ज्यांचे टोमॅटोचे कमी खर्चात जास्त उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. भविष्यात तुम्ही चांगले परिश्रम घेतले तर वाढत्या टोमॅटो मागणीची पूर्तता करू शकू,असे त्यांनी सांगितलं. मिलन चौधरी यांनी देखील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

कांदा पेरणी यंत्र आणि कांद्याची शाश्वत शेती, हमी भाव याबद्दल याबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कंपनीच्या करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी उपस्थितांशी संवाद साधताना गहू, हरबरा, मकी आणि कपाशी पिकाच्या तुलनेत टोमॅटो आणि कांदा हे पीक अधिक फायद्याचे कसे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जैन इरिगेशन आणि कगोमी या दोन्ही कंपन्यांनी मिळून शेतकऱ्यासाठी उत्तम काम करत आहे. पीक, पाणी यांचे व्यवस्थित नियोजन करायला हवे. माती पाणी परीक्षण करावे आणि जमिनीत ज्या घटकांची कमतरता आहे त्याची उणीव दूर करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे, आपली आर्थिक उन्नती साधावी असे सांगून कंपनीत या दोन्ही पिकांच्या भावाला हमी शाश्वत आहे त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात असे विश्वासाने सांगितले.

टोमॅटोवर आंतरराष्ट्रीय काम करणाऱ्या कागोमे इंडियाचे भारतात टोमॅटोच्या संशोधन व विकासाबाबत गेल्या १६ वर्षांपासून होणाऱ्या कार्याविषयी मिलन चौधरी यांनी सुसंवाद साधला. काहीही समस्या असतील तर झाडाचा फोटो काढून आमच्याकडे पाठवा आमचे कडे पाठवले तर त्यावरील उपाय त्वरेने सुचविले जातील असे आवाहन केले. करार शेती विभागाचे सहकारी श्रीराम पाटील यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आशुतोष माळी, कंपनीचे वितरक सुरेश इलेक्ट्रिकलचे संचालक श्रीपाल झाबक हे आणि प्रगतशील शेतकरी चंद्रकांत पाटील, डी. डी. पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.सूत्रसंचालन व्हि आर सोळंकी यांनी तर आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment