जळगाव : जळगाव शहराच्या आकाशवाणी चौकात तापी पाटबंधारे महामंडळाच्या विश्रामगृहाचे अतिक्रमण गेल्या कित्येक वर्षापासून आहे. या अतिक्रमणाबाबत वेळोवेळी आवाज उठवण्यात आला. मात्र तापी पाटबंधारे विभागाने या अतिक्रमणाच्या तक्रारींकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणाला आता वेग आला असून सामाजिक कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांची या अतिक्रमण विरोधाची धार देखील तिव्र झाली आहे.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी तापी पाटबंधारे कार्यालय व विश्रामगृहाच्या जागेच्या दक्षीणेकडील कुंपण भिंतीच्या अतिक्रमणाबाबत जळगाव मनपाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची मनपा प्रशासनाने दखल घेतली असून आयुक्त सतिश कुलकर्णी यांच्या सहीचे पत्र अधिक्षक अभियंता तापी पाटबंधारे महामंडळ यांच्या नावे देण्यात आले आहे.
भविष्यात जळगाव महापालिकेस अथवा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्व्हिस रोड विकसीत करायचा झाल्यास सदर ठिकाणी तापी पाटबंधारे महामंडळाच्या कुंपण भिंतीचे अतिक्रमण आहे. या अतिक्रमणामुळे सव्हीस रोड करण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे या जागेवर सर्व्हिस रोड करता येणार नसल्याचे या पत्राच्या माध्यमातून निदर्शनास आणले गेले आहे. सदर अतिक्रमण तातडीने काढणे गरजेचे असल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 56 मध्ये, तयार करण्यात आलेल्या विकास योजनेच्या व नियोजनाच्या दृष्टीने कोणत्याही इमारती अथवा बांधकामात फेरफार करणे किंवा काढून टाकण्याबाबतची कार्यवाही करण्याचे अधिकार नियोजन प्राधिकरणास अर्थात मनपा आयुक्त यांना असल्याचे पत्रात म्हटले आहे. सदर अतिक्रमीत जागा सर्व्हिस रोड साठी मोकळी करुन देण्याची विनंती या पत्रात केली आहे.