सांगली : स्वातंत्र्य दिनी इस्लामपूर तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यासाठी आलेले रा.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एस.टी. बस चालवली. याप्रकरणी भाजप नेत्यांनी इस्लामपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.
एस.टी. बस अथवा जड वाहन चालवण्याचा कोणताही परवाना, बॅच-बिल्ला नसतांना जयंत पाटील यांनी बेकायदा एस.टी. बस चालवल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आ. जयंत पाटील यांच्या ऐवजी एखाद्या सामान्य नागरिकाने बस चालवली असती तर त्याच्याविरुद्ध नक्कीच गुन्हा दाखल करण्यात आला असता असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी बस चालवल्याने बसमधील काही प्रवाशांनी आनंद लुटला. मात्र हा जीवघेणा प्रकार असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.