जळगाव : कान्हदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्या सहज, बोलीभाषेतील कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा ‘बहिणाईंचे भावविश्व’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवि व नाटककार किरण येले, अध्यक्ष म्हणून विठ्ठल मंदिर संस्थानचे विलास हरी चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कवि अशोक कोतवाल, सुभाष मराठे, विजय जैन, देवेंद्र पाटील, मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख विद्या व्यवहारे, प्रा. डॉ. योगेश महाले, विलास धनवे, डॉ. पुरुषोत्तम महाजन, प्रा. वर्षा उपाध्ये, का. ऊ. कोल्हे विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. कोल्हे, जी. बी. पवार, चित्रा नारखेडे, मनिषा चौधरी, किशोर जाधव, चित्रकार विजय मोहन भाटिया, विशाखा देशमुख, हर्षल पाटील उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. चौधरी परिवारातील सदस्य शोभा, वैशाली, निलिमा, लक्ष्मी, सुनंदा, किरण चौधरी, श्रीधर चौधरी, दिलीप चौधरी यांच्यासह कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला ‘माह्यी माय सरसोती’ ही सामूहिक कविता मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. त्याचबरोबर रूपाली माळी (माझी मुक्ताई), प्राची शेरे (अरे संसार संसार) या विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या काव्यरचना सादर केल्या. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कवी किरण येले यांनी बहिणाईंचे भावविश्व यावेळी उलगडून दाखविले. बहिणाबाईंच्या साहित्याचा संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या विचारपरंपरेशी संबंध जोडत, “बहिणाबाई केवळ स्त्री कवयित्री नव्हत्या; त्या समाजाचे वाचन करणाऱ्या संवेदनशील साहित्यिक होत्या. माणूस हा केंद्रबिंदू ठेवून निर्माण झालेले साहित्यच चिरंतन राहते,” असे त्यांनी प्रतिपादन केले. बहिणाबाईंच्या साहित्याचा अनुभव सांगताना संग्रहालयात आल्यावर “मंदिरात आल्याचे समाधान”व्यक्त केले. बहिणाबाईंच्या कवितेत शेती, निसर्ग, कष्ट, संसार, नाती आणि सामान्य माणसाच्या जगण्याचे गहिरे तत्त्वज्ञान सामावले आहे.
दगडामध्ये देव दिसण्याची भारतीय संस्कृतीतील भावना, माणसामाणसांतील नाती आणि त्यातील भावबंध यांचा संदर्भ देत त्यांनी नात्यांकडे केवळ जोडणे-तोडणे या व्यवहाराच्या दृष्टीने न पाहता त्यातील संवेदना जपण्याची गरज व्यक्त केली. ‘हम्प्टी-डम्प्टी’प्रमाणे नाती जोडली आणि तोडली म्हणजे त्याला खरे नाते म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. “ओठ आणि पोट भरण्यापलीकडे मन भरले पाहिजे,” असे सांगताना निसर्गाशी असलेले मानवी नाते आणि गुलमोहराच्या झाडाचे प्रतीकात्मक महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. कबीर, तुकाराम आणि बहिणाबाई यांनी समाजाकडे केवळ पाहिले नाही, तर समाजाचे अंतरंग अनुभवले आणि ते आपल्या शब्दांतून व्यक्त केले. आपणही जे समजतो, अनुभवतो आणि जगतो, ते कविता, लेखन अथवा सर्जनशील माध्यमातून व्यक्त केले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्या कवितांचे सुद्धा विश्लेषण केले.
गिरीष कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कान्हादेशच्या साहित्य-संस्कृतीचे जतन, बहिणाबाईंच्या साहित्याचे निरंतर जागरण आणि त्यांचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने ‘बहिणाईंचे भावविश्व’ आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच बहिणाई आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचे वर्णन सांगितले. यशस्वितेसाठी सुनील तायडे, ज्ञानेश्वर सोनार, प्रदीप पाटील, शरद धनगर, समाधान महाजन, अमोल भोलाणकर, विवेक व हितेंद्र चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रा. गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले.






