जळगाव/ मुंबई : कविवर्य ना. धों. महानोर यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई ला झाला. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात साहित्य व शेती-पाणी क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याचवेळी परिवर्तन जळगाव निर्मित ‘हंस अकेला’ या संत कबीरांच्या विचारांचा शोध घेणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. श्रीकांत देशमुख, सुधींद्र कुलकर्णी, तसेच ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन दत्ता बाळसराफ यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली.
यावेळी साहित्य पुरस्कार तसेच शेती-पाणी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील पुरस्कारार्थी म्हणून अविनाश उषा वसंत – मुंबई, श्रीकांत साव – चंद्रपूर, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, विठ्ठल खिलारी सातारा यांना सम्मानित करण्यात आले. तर शेती पाणी व्यवस्थापनासाठी वैशाली पाटील दसनूर ता. रावेर, जि. जळगाव, सीमा क्षीरसागर कडवंची ता. जालना यांचा गौरव करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी सांगितले की, साहित्य, वाचन आणि वैचारिक प्रगल्भतेचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनातील संकटांवर मात करून इतर महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. ती पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता निर्माण होण्यासाठी वाचन आवश्यक असून, ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्राला त्याची गरज आहे.
डॉ. श्रीकांत देशमुख यांनी लेखक आणि संशोधकांनी आपल्या लेखनातून व संशोधनातून वर्तमान सामाजिक परिस्थितीचा वेध घेत ठोस सामाजिक भूमिका मांडली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
परिवर्तन जळगावच्या कलाकारांनी पद.. घुंगट के पट खोल रे.. भक्ती परंपरेची ताकद आणि वारकरी परंपरा.. शून्य गड सर बस्ती कौन सोता कौन जागे है..नाथ परंपरा.. सुनता है गुरू ग्यानी.. संत नामदेव यांचे पंढरपूर ते घुमान..घट घट में पंछी.. कोई नहीं अपना समझना.. यासह वेगळ्या दोह्यातुन संत कबीरांच्या विचारांवर आधारित सांस्कृतिक सादरीकरणातून कबीरांचे जीवन, विचार आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. साहित्य, शेती, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम घडविणारा हा पुरस्कार सोहळा आणि ‘हंस अकेला’चा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. गोविंद मोकाशी, पांडुरंग पाटील, श्रध्दा कुलकर्णी, वरुण नेवे, अंजली धुमाळ, रोहित बोरसे, यश महाजन, सुनीला भोलाने, अक्षय नेहे, हर्षल पाटील यांच्यासह परिवर्तन च्या कलावंतानी सादरीकरण केले. शंभू पाटील यांनी विवेचन केले.





