जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांसाठी रोबोटीक लॅब प्रकल्पात गुंतवणुकीचे आमीष दाखवून दहा लाख रुपयात फसवणूक झाल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्तितत्वात नसलेल्या सातपुडा इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीच्या नावाने फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रितेश देवराम पाटील (जिल्हा पेठ), वैशाली पाटील (अनुराग स्टेट बँक कॉलनी), शितल योगेश पाटील (पुणे, ह.मु.जळगाव) किर्ती रितेश पाटील (जिल्हा पेठ), सिमंतनी सुभाष पाटील (राधाकृष्ण नगर) व ज्योती संतोष सोनवणे (छत्रपती कॉलनी, जिल्हा पेठ) अशा सर्व जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रामानंदनगर भागातील किसनराव नगर येथील रहिवासी असलेले अभिषेक जगन्नाथ निंभोरे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
वैशाली पाटील हिने अभिषेक निंभोरे यांची आई ज्योती निंभोरे यांच्याशी ओळख परिचय केल्यानंतर कालांतराने मागासवर्गीय समुदायासाठी काम करणाऱ्या सातपुडा इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीत गुंतवणुक करण्याचा विषय अभिषेक निंभोरे यांना सादर केला. त्यानंतर सातपुडा इन्फोटेक प्रा.लि. या कार्यालयात रितेश पाटील यांच्याशी त्यांची ओळख करुन देण्यात आली.
यावेळी त्यांना कंपनीच्या रोबोटीक लॅब संबंधी माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील बाराशे शाळांसाठी अशा लॅब उभारण्याची फ्रान्चायझी द्यायची असल्याचे निंभोरे यांना सांगण्यात आले. याकामी दहा व पंचवीस लाख गुंतवणुकीचा प्लॅन सादर करण्यात आला. एका फ्रन्चायझीसाठी दहा लाख रुपयांची गुंतवणुक केल्यानंतर दरमहा 35 हजार रुपये उत्पन्न प्राप्त होणार असल्याच्या भुलथापा देण्यात आल्या.
तालुका फ्रन्चायझीसाठी 25 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास दरमहा दोन लाख रुपयांच्या वर उत्पन्न मिळणार असल्याचे रितेश पाटील याने त्यांना समजावून सांगितले. रितेश पाटील याने निंभोरे यांना लगेच पैसे गुंतवा आणि लगेच कर्ज मंजुर होताच तुमचा पैसा परत मिळवा तसेच दरमहा उत्पन्न सुरु होईल अशा भुलथापा देण्यात आल्या.
अभिषेक निंभोरे यांच्याकडून 26 डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदाचा 10 लाख रुपयांचा धनादेश रितेश पाटील याने घेतला. तो लगेच 4 जानेवारी रोजी निभोंरे यांच्या खात्यातून डेबीट झाल्यावर रितेश पाटील याच्याकडे स्टॅपवरील करार आणि रिसीटची मागणी निंभोरे यांनी केली. त्यावेळी टाळाटाळ करण्यात आली.
फ्रान्चायझी मिळाली नाही म्हणून रितेश आणि वैशाली यांच्याकडे पैशांसाठी अभिषेक निंभोरे यांनी तगादा सुरु केला. खासगी लेखा परिक्षकाकडून या कंपनी बाबत चौकशी करण्यात आली असता, या कंपनीला केव्हाच कुलूप लागले असल्याचे समजले. संचालक म्हणून शितल योगेश पाटील, किर्ती रितेश पाटील, चित्रा ब्रिजेश पाटील, सिमंतनी सुभाष कुळकर्णी, ज्योती संतोष सोनवणे अशांची नावे पुढे आली. या फसवणूकीप्रकरणी अभिषेक निभांरे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन सर्व सात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.






