नागपूर : पोलिस दलातील बदल्यांच्या संदर्भातील फोन टॅपींग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर झाला आहे. या अहवालामुळे राज्यातील नेते अस्वस्थ झाले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यंमांसमवेत संवाद साधतांना केला आहे. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिप्रश्न केला की महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी कुणी केली? सचिन वाझे यांच्यासारख्या निलंबीत अधिका-याला पुन्हा सेवेत घेऊन त्यांना महत्वाच्या केसेस देऊन सिंडीकेट राज चालवण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. यामुळे पोलिस दल बदनाम झाले की त्यांचे नाव झाले असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणी गायब केला असला तरीदेखील त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. खासगी डीव्हीआर नष्ट करणे सोपे असले तरी पोलिसांचा डीव्हीआर नष्ट अथवा गायब करणे सोपे नसल्याचे म्हणत त्यांनी पुरावे मिटणार नसल्याची व्यवस्था करुन ठेवली असल्याचे म्हटले आहे.