जळगाव : जळके विज उपकेंद्राच्या हद्दीत असलेल्या गावांसह ग्रामपंचायतीकडे विज वसुलीचा तगादा लागला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास विज मंडळाचे अधिकारी कॉल घेत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
संबंधित विभागातील कर्मचा-यांना जुन्या पाणीपुरवठ्याच्या संयोजनाबाबत पुरेशी माहिती नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिका-यांचे म्हणणे आहे. जळके परिसरातील बहुतेक गावांमधे पाणी पुरवठा विज जोडणीबाबत अनेक तक्रारी आहेत. यात प्रामुख्याने विजेचा वापर नसलेल्या ग्राहकांकडे बिलाची आकारणी केली जात असल्याची ओरड केली जात आहे. यात ग्रामपंचायतीच्या विजबिलाची थकबाकी दिसत असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत जळके विज उपकेंद्र परिसरातील जळके, वसंतवाडी, विटनेर, वावडदा, लोणवाडी, सुभाषवाडी, झोपडीतांडा व वराड येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचे शिष्टमंडळ नागरिकांसमवेत अभियंत्यांना भेटण्यास गेले होते. मात्र तेथे कुणीही भेटले नाही. संबधीत अभियंत्यास फोन केला असता सर्वांना वेगळेच उत्तर दिले. आपल्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे मी आपल्या सवडीने कार्यभार बघत आहे. असे उत्तर ऐकल्यामुळे सर्वच जण संतप्त झाले होते. विज उपकेंद्र केवळ वसुलीसाठीच आहे काय? अशी संतापाची भावना ग्रामपंचायत पदाधिका-यांसह नागरिकांमधे पसरली. विजेच्या संदर्भातील समस्य वेळीच सोडवल्या गेल्या नाही तर मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.