जळगाव : भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गावर सक्तीने वाहने थांबवून वाहनधारकांची लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. रविवारी मधरात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने लुटारुंना ताब्यात घेतल्यामुळे लुटारुंचा लुटमारीचा डाव उधळला. भरत तिवारी (26), अक्षय शामकांत कुलकर्णी (23) आणि आवेश शेख बिस्मिल्ला (20) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अटकेतील भरत तिवारी के. नारखेडे शाळेजवळ तापी नगर येथे, अक्षय कुलकर्णी हा नारायण नगरात तर आवेश जिया कॉलनीत राहतो. मुज्जीमल शेख कलिम (19) याला देखील नंतर ताब्यात घेण्यात आले.
मध्यरात्रीच्या सुमारास भुसावळ येथील महामार्गावरील पुलाजवळ पाच जण वाहने अडवून लुटमारीच्या प्रयत्नात असतांना याबाबत पोलिसांना सुगावा लागला. क्षणाचाही विलंब न करता पो.नि. दिलीप भागवत व बाबासाहेब ठोंबे यांच्या निर्देशाखाली पथकाने चौघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यातील दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. लुटीसाठी लागणारे सर्व अवजारे या लुटारुंकडे आढळून आली. या प्रकरणी भा.द.वि. 399, 402, 37(1),(3), मुंबई पोलीस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.