अनैतिक संबंधातून बालकाची भिवंडीत हत्या

काल्पनिक छायाचित्र

भिवंडी : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या भिवंडी येथील आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण व त्यानंतर हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जितेंद्र मधेशिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जितेंद्र मधेशिया याचे तालुक्यातील कारीवली येथील एका कुटुंबाच्या घरी खानावळीसाठी नेहमी येणे जाणे होते. त्या माध्यमातून त्याचे त्या कुटूंबातील महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. जेवण करण्यासाठी आल्यानंतर तो सदर महिलेसोबत लगट करण्यास मागेपुढे बघत नव्हता.

खानावळीत जेवण करण्यासाठी येत असलेल्या जितेंद्र मधेशिया याचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती आठ वर्षाच्या बालकाला समजली होती. त्या बालकाने याबाबतची माहिती त्याच्या वडीलांना सांगितली. त्यातून घरात वाद होण्यास सुरुवात झाली. घरात सुरु झालेल्या वादातून ती खानावळ बंद करण्यात आली. या रागातून जितेंद्र मधेशिया याने आठ वर्षाच्या त्या महिलेच्या मुलाचे अपहरण करुन नंतर गळा आवळून खून केला. आपला मुलगा सापडत नसल्यामुळे बालकाच्या वडीलांनी भोईवाडा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी 16 जुलै रोजी बालकाचा मृतदेह इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आढळून आला. पोलिसांनी तपासाचे कौशल्य वापरत जितेंद्र जितेंद्र मधेशिया याला अटक केली.

खेळण्याचा बहाणा करत आपण बालकाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर नेले व तेथेच त्याची गळा आवळून हत्या केल्याची कबुली जितेंद्र मधेशिया याने पोलिसांना दिली. अठरा तासात भोईवाडा पोलिसांच्या पथकाने या खूनाचा उलगडा केला. आरोपी जितेंद्र मधेशिया यास न्यायालयत हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगीचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here