गोंदीया (अनमोल पटले) : दरवर्षी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. रावणाच्या प्रतिकृतीचे दहण करण्याची प्रथा बंद करण्यात यावी तसेच या कृतीला परवानगी देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन बिरसा क्रांति दल, राणी दुर्गावती मंडळ, संविधान मैत्री संघ, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन आदी संघटनांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, नवनियुक्त उपविभागिय अधिकारी विश्वास सिरसाट, होम डीवायएसपी तेजस्विनी कदम यांनी निवेदन स्विकारले.
राजा रावण हा मूलनिवासी आदिवासी समुदायाच्या महासम्राट होता. हजारो वर्षापासून मूलनिवासी आदिवासी त्याची पूजा करतात, त्याला आपला महानायक, शुरवीर योद्धा, महाज्ञानी, बलाढ्य शक्तीशाली विद्वान, अनेक शास्त्रांचा अभ्यासक व शंभुचा पुजारी मानतात. आजही रावण पूजा मेघनाथ पूजा अनेक जण करतात. तामिळनाडू राज्यात रावणाची 352 मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर राजा रावणाची पूजा केली जाते.
निवेदन देताना बिरसा क्रांति दलाचे मालती किन्नाके, राणी दुर्गावती मंडलच्या अध्यक्षा गीतताई सलाम, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, हेमलता अहाके, सरिता भलावी, गीता तुमडाम, बिंदु कोलवते, शोभा कुसराम, लता मडावी, वनिता सलामे, योगिता गेडाम, हिमांशु अहाके, सुमित उइके, आदित्य सलाम व अन्य उपस्थित होते.