औरंगाबाद : औरंगाबाद येथील लाचखोर अभियंत्याच्या लॉकरची तपासणी केली असता त्यात 67 तोळे सोने तसेच 26 लाख 4 हजार 500 रुपयांची रोकड आढळून आली आहे. संजय राजाराम पाटील (52) रा. उल्का नगरी औरंगाबाद असे एसीबीच्या तावडीत सापडलेल्या आणि आता जामीनावर सुटलेल्या सार्वजनीक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
मुकुंदनगर भागातील मंदिर सभागृहाच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्याकामी सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी शाखा अभियंता संजय राजाराम पाटील याने तक्रारदाराकडे केली होती. या मागणीची खात्री केल्यानंतर त्याला एसीबीने अटक केली. मंदीर सभागृहाचे रखडलेले बांधकाम निधीअभावी रखडले होते. वाय.पी. डेव्हलपर्स या संस्थेकडून ते तक्रारदाराच्या एजन्सीला देण्यात आले होते. या कामासाठी निधीची मागणी तक्रारदाराने केली होती. बांधकामात बदल आणि जुन्या कामाचे नव्या दराने बिल काढण्याकामी एकुण सव्वा लाख रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली. शनिवार सुटीचा दिवस असतांना उल्का नगरी येथील निवासस्थनाजवळ अभियंत्याने तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांचा पहिला हप्ता घेत असतांनाच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने त्याच्यावर झडप घातली. अटकेनंतर लाखचोर अभियंता संजय पाटील याची सशर्त जामीनावर सुटका झाली. त्याच्या इतर मालमत्ता देखील एसीबी कडून तपासल्या जाणार आहेत.