नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हा मुलगा माझा नाही असे म्हणत अवघ्या चार वर्षाच्या बालकाला पोत्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक माधव देव्हारे असे 28 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील नारनाळी (ता.कंधार) येथे घडलेल्या या घटनेतील बालकाचे नाव आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत नेहमी वाद घालणा-या माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. त्यापैकी लहान मुलगा अभिषेक हा माझा मुलगाच नाही असे तो पत्नीला म्हणत असे. घटनेच्या दिवशी त्याने अभिषेक यास गोड बोलून रिक्षात बसवून नायगाव तालुक्यातील राजेर येथील गोदावरी नदीच्या पात्राकडे नेले. तेथे गेल्यावर माधवने निरागस अभिषेकला पोत्यात बांधून नदीत फेकून दिले. दरम्यान बालक दिसत नसल्यामुळे त्याच्या अपहराणाचा गुन्हा कंधार पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी माधव याच्यावर पत्नीचा संशय असल्यामुळे त्याला पोलिसांनी बोलते केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी बालकाचा शोध घेतला असता तो धर्माबाद तालुक्यातील येल्लापूरच्या शिवारात पोत्यात आढळून आला.