जळगाव : गेल्या पंधरा वर्षापासून सोने चांदीचे दागिने तयार करणा-या कारागिराने मालकाचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघा सोने व्यापा-यांची एकुण 5 लाख 74 हजार रुपयात फसवणूक केली आहे. फसवणूकीनंतर तो रहात असलेल्या पश्चिम बंगाल राज्यात पळून गेला असण्याची शक्यता आहे. सुशांत तारकनाथ भुतका रा. मारोती पेठ जळगाव आणि दिपक संघवी अशी फसवणूक झालेल्या दोघा सोने व्यापा-यांची नावे आहेत. बापन मंटू कारक रा. पाकुडदाणा पो. हरीरामपुर पश्चिम मेदनापूर पश्चिम बंगाल असे फसवणूक करणा-या सोने कारागिराचे नाव आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापन कारक हा कारागिर सुशांत भुतका यांच्या सोने चांदीचे दागिने तयार करण्याच्या कारखान्यात गेल्या पंधरा वर्षापासून कामाला होता. तो त्यांच्या कारखान्यातच रहात होता. सुशांत भुतका यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने त्यांच्या माध्यमातून दिपक संघवी यांच्याकडील 3 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोने आणि सुशांत भुतका यांच्याकडून घर बांधकामाच्या बहाण्याने 2 लाख 60 हजार रुपये असे एकुण 5 लाख 74 हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पळून गेला. त्याचा कुठेही तपास लागत नसल्याचे दिसून आल्यानंतर याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला सुशांत भुतका यांनी त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी अद्याप फरार असून पोलिस उप निरीक्षक प्रदीप बोरुडे पुढील तपास करत आहेत.