बारागाड्या अंगावरुन गेल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : बारा गाड्यांचे चाक अंगावरुन गेल्याने तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल पंडीत पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या एरंडोल तालुक्यातील तळई येथील तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एरंडोल तालुक्यातील तळई या गावी 29 नोव्हेंबर रोजी सालाबादप्रमाणे चंपाषष्टीनिमीत्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. दरम्यान सायंकाळी बारागाड्या ओढल्या जात असतांना गर्दीत लोटालोटी झाल्याने गाड्यांच्या खाली राहुल पाटील सापडला. तीस वर्ष वयाच्या राहुलच्या अंगावरुन बारागाड्यांची चाके गेली. त्यात तो जबर जखमी झाला. उपचारासाठी त्याला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 30 नोव्हेंबरच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

जिल्हा बॅंकेच्या एरंडोल तालुक्यातील निपाणे शाखेत राहुल पाटील नोकरीला होता. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात विविध गावांना यात्रेदरम्यान अथवा धार्मिक कार्यक्रमानिमीत्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. या घटनेत यापुर्वी मानवी जीव जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या घटनांना अनुसरुन गुन्हे देखील दाखल झाले आहेत. भुसावळ येथील एका घटनेत पोलिसाचा मृत्यु झाला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here