जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद नजीक असलेल्या वाघूर धरण पाटचारीतील वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी आज तीन मुले पोहण्यासाठी गेले होते. पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुपारी तिन वाजेच्या सुमारास ती मुले बुडून मृत्यूच्या दारी गेल्याची दुर्दैवी घटना आज घडली. पाण्यात बुडालेली तिन्ही मुले ही नशिराबाद येथील भवानी नगर परिसरातील राहणारी होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
मोहित दिलीप नाथ (१२), आकाश विजय जाधव (१३), ओम सुनील महाजन (११) अशी बुडालेल्या तिन्ही मुलांची नावे आहेत. ही तिन्ही मुले पंधरा वर्षाच्या आतील आहेत.
घटनेच्या वेळी हजर असलेल्या काही ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच स.पो.नि. प्रविण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रविण ढाके, पोलिस नाईक रविंद्र इंधाटे असे सर्व जण घटनास्थळी दाखल झाले.
पोहणा-यांच्या मदतीने मोहितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर अनुक्रमे आकाश व ओम यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिन्ही मुलांचे मृतदेह शव विच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.