मुंबई : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत दिसून येत आहेत. मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट केली जाणार असून नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीत खातेबदल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडे गृहनिर्माण खाते दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या एवजी कृषीसह एक वाढीव मंत्रीपद रा.कॉ.च्या हिश्श्याला जावू शकते.
गृहनिर्माण, कृषी, रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार, अल्पसंख्यांक या खात्यांमध्ये बदल होणार असल्याचे समजते. रा.कॉ. आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात जागा मिळेल असे म्हटले जात आहे. या दोन्ही पक्षातील मंत्रिमंडळात समाविष्ट होणारे हे दोन नेते कोण असतील हा सस्पेंस निर्माण झाला आहे.
एकीकडे राज्य सरकार दोलायमान असून केव्हाही सत्तापालट होण्याची शक्यता असल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी महाविकास आघाडी शासनात खांदेपालट होण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
सध्या रा.कॉ. कडे असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. जर तसे झाले तर या खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोणती जबाबदारी मिळेल याची देखील चर्चा या निमीत्ताने सुरु आहे.