पर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

On: July 4, 2022 6:18 PM

जळगाव – ‘सध्या पाऊस लांबला, मागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहे. जैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन केले नाही, तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे, यातूनच वृक्षारोपणासह, वृक्षसंवर्धनाचे कार्य करावे यासाठी व्यापक स्वरूपात लोकसहभाग अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.’

मेहरूण तलाव परिसरातील सुबोनियो पक्षी घराजवळ झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमिल देशपांडे, सचिव विजय वाणी, सौ. संध्या वाणी, सौ. निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, सौ. सुमित्रा पाटील, उद्योजक नंदू अडवाणी, दीपक धांडे, संतोष क्षीरसागर, रमेश पहेलानी, समाजसेवक अनिल सोनवणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, वरिष्ठ सहकारी अनिल जोशी उपस्थितीत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या तीन वर्षापासून मेहरूण तलावाच्या काठावर सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुरू असून झाडांची देखरेखही ठेवली जाते. यामध्ये आता एक हजार झाडे लावण्यात येणार आहे. याची सुरवात आज मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणाने झाली.

जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी वृक्षारोपण उपक्रमास शुभेच्छा देताना सांगितले की, ‘शासनाने नेहमीच पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले आहे. यावर्षी शाळांसाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासंबंधित लांडोरखोरी उद्यान येथे लवकरच स्टॉल लावणार असल्याचे विवेक होशिंग म्हणाले.’ जैन इरिगेशनचे अतिन त्यागी यांनी कंपनी करित असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या कार्याबद्दल सांगितले. वृक्षारोपण ही संकल्पना व्यापक स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून शास्त्रीय पद्धतीने, स्थानिक मातीत वाढणारी, जैवविविधता जपणारी झाडं गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे लावली जात आहे. यामध्ये समाजातील सेवाभावी संस्था, व्यक्ती, समाज सर्वांनी सहकार्य वाढवावे जेणे करून हरित जळगावचे स्वप्न साकारता येईल. असे अतिन त्यागी म्हणाले.’ अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा ध्यास घेऊन मराठी प्रतिष्ठान व गांधी रिसर्च फाऊंडेशन करित असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. विजय वाणी यांनी आभार मानले. आजच्या वृक्षारोपणाप्रसंगी रमेश पहेलानी यांच्यासह गायक कलावंतांनी योगदान दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment