मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर तिन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. आता मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा संपुष्टात येत असून उद्या होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
महाविकास आघाडी सरकार मोडीत काढून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंड करणा-या शिवसेना आमदारांच्या गटासह भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. उद्या होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन तृतीयांश तर उर्वरित मंत्रिपदे शिंदे गटातील आमदारांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आशिष शेलार यांचा समावेश राहणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. बंडखोरी करणा-या नेत्यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. यामधे उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश राहणार असल्याचे म्हटले जात आहे.







