शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार

जळगाव, ता. १२ : जम्मू-काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे. जळगावच्या जैन हिल्सवर १० सप्टेंबर रोजी झालेल्या या करारावर कंपनीतर्फे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी तर विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा.नझीर अहमद गनाई यांनी सह्या केल्या आहेत.

आधुनिक पद्धती व तंत्र वापरून विविध पिकांचे उत्कृष्टरितीने उत्पादन कसे घ्यायचे, जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या समस्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा आणि आवश्यक तेवढीच संसाधने वापरून उत्पादन व उत्पादकता कशी वाढवायची यासंबंधीचे मार्गदर्शन करण्याबरोबरच जैन कंपनीने जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) व जैव तंत्रज्ञानाचा (बायोटेक्नॉलॉजी) वापर करून तयार केलेले उत्कृष्ट प्रतीचे, उच्च दर्ज्याचे, रोगविरहीत व व्हायरसमुक्त लागवडीचे साहित्य पुरवायचे आहे. तसेच शेती क्षेत्रातील शाश्वतता कायम राखण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान व त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना आज भेडसावत असलेल्या समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जैन कंपनीने मार्गदर्शन करावयाचे आहे. तसे करारात नमूद केले आहे.

याप्रसंगी बोलताना जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नझीर अहमद गनाई म्हणाले की, “सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादन वाढीसंबंधी जैन इरिगेशनने आम्हांला मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे. सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टनाची, हिमाचलची ८ ते ९ टनाची तर पश्चिमात्य देशांची ६७ टनांची आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्च वाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे जे आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती उपलब्ध होणार आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे निश्चितच उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल, पाणी वापरात बचत होईल आणि विभागातील अन्नधान्य सुरक्षिततेला त्यामुळे हातभार लागून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.”

या सहकार्य करारावरती भाष्य करताना कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होत असलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे परमपूज्य पिताजी भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब व छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमे व लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी) लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्या प्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढू शकेल.”

“सहकार्य कराराचा एक भाग म्हणून कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना जळगाव येथे बोलावून प्रशिक्षण देण्यात येईल. विविध विषयांचे ८ ते १५ दिवसांचे कोर्सेस त्यांच्यासाठी चालविण्यात येतील. तसेच जैन इरिगेशनमधील अनुभवी व तज्ज्ञ लोक जम्मू-काश्मीर विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अध्यापनाद्वारे मार्गदर्शन करतील”, असेही श्री. अजित जैन म्हणाले. ठिबक सिंचनावर भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मागील वीस वर्षांपासून आम्ही जळगाव व अन्य ठिकाणी राबवित आहोत. हा प्रयोग जम्मू-काश्मीरमध्येही राबवावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असेही श्री. जैन यांनी कुलगुरुंना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here