यवतमाळ (घाटंजी) अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूका आगामी जानेवारी महिन्यात आहेत. दरम्यान यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी एका प्रकरणात दिलेल्या निकालानुसार आमडी येथील दोघा महिला सदस्यांचे पद कायम राहिले असून अर्जदार गौरव ठाकरे यांचा अर्ज नामंजूर केला आहे. अवघ्या चार महिन्यावर असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर देण्यात आलेल्या या निकालामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत राजकारणात खळबळ माजली आहे.
घाटंजी तालुक्यातील आमडी येथील महीला ग्रामपंचायत सदस्य शोभा अनंतराव ठाकरे व वैशाली विनोद गराटे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (ह) नुसार अपात्र करण्यात यावे, असा अर्ज अर्जदार गौरव पुरुषोत्तम ठाकरे (रा. आमडी ता. घाटंजी) यांनी यवतमाळच्या अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या न्यायालयात दाखल केला होता. अर्जदार व गैरअर्जदार यांनी त्यांच्या वकीलामार्फत केलेल्या युक्तीवादानंतर गौरव ठाकरे यांचा अर्ज अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या शोभा अनंतराव ठाकरे व वैशाली विनोद गराटे यांचे सदस्य पद कायम राहिले आहे.
शोभा अनंतराव ठाकरे व वैशाली विनोद गराटे यांनी सन २०२४-२५ काळातील ग्रामपंचायत कर भरला नसल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ग्रा.प. अधिकारी आशिष कोलते यांनी तसा अहवाल दिला होता. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (ह) नुसार त्यांना अपात्र करण्यात यावे असा अहवालासह अर्ज गौरव पुरुषोत्तम ठाकरे यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केला. आपल्याला ग्रामपंचायतीकडून कर मागणीचे बिल मिळाले नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्याची पोच पावती न्यायालयात आशिसः कोलते यांनी सादर केली नाही. त्यामुळे अर्जदार गौरव ठाकरे यांचा अर्ज फेटाळण्यात आला. गैरअर्जदार शोभा ठाकरे व वैशाली गरोटे यांची बाजू ॲड. परमेश्वर अडकीने यांनी न्यायालयात मांडली. अर्जदार गौरव ठाकरे यांच्यावतीने ॲड. अजय डाखोरे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.







