महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका होताहेत. राहुरीपेक्षा बारामतीची चर्चा जास्तच. तेथे खासदारकीचा राजीनामा देऊन रिक्त झालेल्या जागेवर पुत्र पार्थची वर्णी (सोय) लावणाऱ्या डी.सी.एम. बनलेल्या सुनेत्राताई पवार या सहानुभूतीच्या लाटेवर पोट निवडणूक लढत आहेत. त्या विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अजितदादाच्या पत्नी आहेत असे वारंवार सांगितले जातेय. ते सा-या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी असे राकॉ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार आणि दादांबद्दल प्रेम-सहानुभूती वाटणाऱ्या किंवा आता वारा वाहिल तशी पाठ फिरवणा-यांकडून सांगून झाले आहे. त्यासाठी बारामतीतील मतदारांचा कोणीच अजिबात विचार केला नाही.
ज्यांना बिनविरोध निवडून जायचे त्या सुनेत्रा पवारांनी संभाव्य विरोध मोडून काढण्यासाठी गेल्या आठवडयात थेट दिल्लीत जाऊन अनेक नेत्यांची भेट घेणे, फोनाफोनी करण्याचे उपक्रम केले. शरद पवार यांनी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना फोन करून राकॉ त भाजपाच्या पंखाखाली हायजॅक झालेल्या गटाच्या त्या भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार असल्या तरी आम्ही म्हणजे रा कॉ शरद पवार गट उमेदवार देणार नाही, तुम्हीही (म्हणजे शिवसेना) उमेदवार देऊ नका, तुम्ही आता मतदानाची मदत करा उद्या आम्ही (रा कॉ) विधानपरिषदेवर जाण्यासाठी साथ देऊ अशी सौदेबाजी केल्याचे उघड झाले आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना उबाठा गटाने मविआत चर्चा करण्याऐवजी चर्चा न करताच सांगलीचा उमेदवार त्या जागेवर जाहीर केला होता. ही जागा काँग्रेसची म्हणून कार्यकर्ते ओरडत राहिले.
नाही तरी राज्याचे किंवा केंद्राचे नेते कार्यकर्त्यांना विचारत नाही. नेत्यांनी त्यांची राजकीय सोय पाहून सोयीस्कर रित्या विस्मरणात जायचे आणि नेत्यांचा निर्णय नंदीबैलाप्रमाने होकारार्थी मान हलवून स्विकारायचा असेच सर्व सुरु असल्याचे दिसते.
सुनेत्राताईंनी काल उमेद्वारी अर्ज अर्ज भरला. शिवाय १९ जणांनी अर्ज भरला. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ही निवडणूक लढणारच अशी घोषणा केली. अँड. आकाश मोरे (धनगर) यांचा समावेश आहे. दुसरे आंदोलन वीर लक्ष्मण हाके यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली. पण अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर कोण कोण लढतीत शिल्लक राहतो ते स्पष्ट होईल. काँग्रेसचा उमेदवार स्पर्धेत दिसला तरी आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्याशी बोलणी करु असे रा. काँ. च्या दुसऱ्या गटाचे नेते सुनील तटकरे यांचे म्हणणे आहे. म्हणजे दिल्लीचे नेते लक्ष घालून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना गप्प बसवतील असे त्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सुनेत्राताई बिनविरोध याव्या असे वाटते. नाहीतर घोडेबाजार आहेच. पाण्यासारख्या पैसा सोडून, म्हणजे कोट्यावधी उधळून त्यांना निवडून आणले जाईल. सर्वांशी योग्य ती डील (सौदेबाजी) होईल असे बोलले जाते. सर्वच ठिकाणी पैसाच अर्थात लिया दिया होईल असे नाही.
सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राच्या प्रकरणात अडकवून ठेवले आहे. तेव्हा आता ब-या बोलाने आमचे ऐका नाही तर परिणाम भोगा अस फर्मान सुटू शकते. भाजपला राकाँ आणि शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षांवर ताबा हवा आहे. त्यासाठी मांडलीकही हवेत. ते मिळाले आहेत. सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही डी.सी.एम म्हणजे दोन कठपुतळ्या असल्याचे लोकसत्ताने छापले आहेच. बारामतीतल्या मतदार बांधवांना काय वाटते याचा कोणी विचार करत नाही. राज्य व केंद्राच्या नेत्यांच्या सोयीप्रमाणे आता घडतांना दिसते.
काहींना वाटते की सुनेत्राताईंना म्हणजे रा कॉ ला धो-धो पैसा सोडू द्यावा. पाचशे ते हजार बाराशे कोटी रुपये उधळू द्यावे म्हणजे उपाशी पोटी राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची सोय होईल. बारामतीत होणारी निवडणूक सहानुभूतीपूर्ण की कार्यक्षमतेवर होणार याचा फैसला नेत्यांएवजी मतदारांना करु द्यावा. बिनविरोध ही नेत्यांसाठी सोय असली तरी मतदारांना लाथ मारण्यासारखे ठरेल असे अनेकांना वाटते. शेवटी जनता श्रेष्ठ की टक्केवारी उकळून गब्बर झालेले? हे कोणी ठरवायचे?








