जळगाव : सत्य, अहिंसा, समता, सेवा आणि स्वावलंबन या गांधीवादी मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञान व उद्योजकतेची जोड देऊन समाजातील वंचित घटकांना सन्मानासोबत आर्थिक समृद्धी मिळवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. हरिजन सेवक संघाच्या राष्ट्रीय परिषदेस जैन हिल्सला प्रारंभ झाला. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकरकुमार सन्याल तर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन उद्घाटक होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी खासदार नरेशकुमार यादव, डॉ. सुदर्शन अय्यंगार, माजी राज्य मंत्री संजय पासवान, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष मोहन जोशी, जळगाव हरिजन सेवक संघाचे सचिव शंभु पाटील, सुधेंद्र कुळकर्णी, कुंवर शेखर, पवनार आश्रमाच्या ज्योती दिदी या मान्यवरांची उपस्थिती होती. या परिषदेस देशभरातील गांधीवादी विचारवंत, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर संत तुकडोजी महाराजांचे ‘हर देश में तू, हर वेश में तू’ हे गीत प्रशांत सूर्यवंशी यांनी सादर केले. जळगाव हरिजन सेवक संघाचे सचिव शंभू पाटील यांनी प्रास्तविक केले तर महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ही परिषद होत असल्याचे सांगत, परिषदेतून गांधीजींचा सत्य, अहिंसा, समता, स्वच्छता आणि सर्वसमावेशकतेचा विचार आत्मसात करून समाजासाठी नवा विचार, नवा मार्ग आणि नवा कार्यक्रम घेऊन पुढे जाण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. अशोक जैन व अनिल जैन यांनी श्रद्धेय. भवरलालजी जैन यांच्या गांधीवादी विचारांना पुढे नेत समाजसेवेचे कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
*‘वेस्ट टू वेल्थ’मधून नव्या संधी- अनिल जैन* – शेती आणि उद्योगातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर अर्थात ‘वेस्ट टू वेल्थ’ ही नव्या युगातील मोठी संधी आहे. कचऱ्यातून ऊर्जा, रोजगार आणि संपत्ती निर्माण करून वंचित घटकांना उद्योजक बनविता येऊ शकते. गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची शक्ती यांची सांगड घालून सन्मान आणि समृद्धीचा नवा भारत घडविता येईल, असा विश्वास या कार्यक्रमाचे उद्घाटक जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केला. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून आजच्या भारताला आणि विशेषतः देशाचे भविष्य घडविणाऱ्या तरुण पिढीला गांधीजींचे विचार व मूल्ये पोहोचविण्यासाठी गांधीतीर्थची निर्मिती श्रद्धेय मोठ्याभाऊंनी केली आहे, असे ही नमूद केले. तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात सत्य, अहिंसा, समता, स्वावलंबन आणि मानवतेची मूल्ये तरुणांच्या मनापर्यंत पोहोचत आहे असे ही ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. शंकरकुमार सन्याल यांनी सांगितले की, ‘सत्य, सेवा आणि समतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती हाच गांधी विचारांचा खरा वारसा असल्याचे सांगितले. संघर्षमय आणि अस्थिर होत चाललेल्या जगात गांधी विचार अधिक प्रासंगिक ठरत असून शांतता, सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास आणि मानवकल्याणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले. हरिजन सेवक संघाने शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून गांधींचे कार्य पुढे नेत असल्याचे सांगितले. तरुण पिढीने गांधी विचारांची सांगड आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारीशी घालावी, असेही ते म्हणाले.
डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी गांधी विचारांच्या सखोल अभ्यासासोबतच रचनात्मक कार्य आणि ग्रामस्वराज्य बळकट करण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना त्यामागील ‘तत्त्व’ जपले पाहिजे. सेवाभावात अहंकार न आणता समाजाच्या विकासात सहभागी होण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गांधींच्या प्रेमभावनेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाच्या संघर्षशील विचारांना एकत्र आणण्याची गरज असल्याचेही डॉ. अय्यंगार यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला यांनी केले. परिषदेत सहभागी या सर्व मान्यवरांनी गांधी तीर्थ येथे भेट दिली. सायंकाळी जैन हिल्स येथे महात्मा गांधी यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित ‘बंदे में है दम’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या परिषदेत सहभागी सर्वजण धुळे येथील कारागृहास भेट देणार आहेत जिथे विनोबा भावे व साने गुरुजींनी कारावास भोगला त्या भूमिला नमन करून दुपारी या परिषदेत संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात विचार विनिमय होणार आहे.






