मुंबई : अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेतील रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोस्वामी यांनी त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. हरीश साळवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाजू विषद केली. जवळपास सहा तास चाललेल्या या सुनावणीनंतर देखील अर्णब यांना तत्काळ जामीन देण्याचा निर्णय झालेला नाही. त्यांचा अंतरिम जामीन अर्ज राखून ठेवण्यत आला आहे.
सीआरपीसी 349 नुसार त्यांना विनंती अर्ज करता येऊ शकतो असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी यांना जामीन करण्याची मुभा देण्यात आली आहे. सत्र न्यायालयात 4 दिवसांत यावर निकाल देता येईल, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
अर्णब यांच्या तत्काळ जामीन अर्जावर नकार आल्यामुळे त्यांना आज देखील कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे. सत्र न्यायालयातच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होईल. उद्या रविवार असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावरील प्रक्रिया बहुतेक सोमवारी होवू शकते.