मुंबई : अक्षय तृतीया या सणाला हिंदु संस्कृतीत एक महत्वाचे स्थान आहे. या दिवशी सोने खरेदीचा चांगला मुहुर्त समजला जातो. मात्र कोरोना आणी लॉकडाऊनमुळे यावर्षी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर विरजन पडले. गेल्या दिड महिन्यापासून महाराष्ट्रातील सराफ बाजार बंद आहे. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या दिवशी ग्राहकांचा सोने खरेदीचा मुहुर्त टळला. लग्न ठरलेल्या वधू वरांचे लग्न लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडले. त्यामुळे देखील सराफ व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला.
सुवर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे केवळ मुंबईतील सराफ बाजाराचे सुमारे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन अथवा गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोने खरेदी शक्य झाली आहे. सध्या कोरोना व लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली जागतिक पातळीवरील अनिश्चितता सोने – चांदीचे दर वरचढ राहण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर प्रति तोळा 56 हजार रुपयांपर्यंत गेला होता. तसेच गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजाराच्या घरात गेला होता. या वर्षी अक्षय तृतीयेला सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजाराच्या घरात होता.