जालना : चाइल्ड लाइन, बालकल्याण समिती व स्थानिक पोलिसांनी 1098 या हेल्पलाइनवर आलेल्या माहितीच्या आधारे सज्ञान तरुणीचा विवाह ती अल्पवयीन असल्याचे समजून रोखला. वधू 19 वर्षाची असतांना देखील विवाह रोखला गेल्यामुळे नातेवाईकांनी अप्पर पोलिस अधिक्षकांची भेट घेत समाजात बदनामी झाल्याची तक्रार केली. संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे केली.
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली या गावी 4 मे रोजी विवाह सोहळा सुरु होता. कुणीतरी 1098 या हेल्पलाइन क्रमांकावर मुलगी अल्पवयीन सतरा वर्षाची असल्याचे कळवले. त्यानुसार गावात पोलिस पथक दाखल झाले. त्यांना मुलगा व मुलगी सज्ञान असल्याचे पुरावे सादर करण्यात आले. मात्र तरीदेखील बालविवाह रोखला अशा आशयाचे वृत्त प्रशासनाकडून प्रसार माध्यमांना दिल्याचा आरोप होत आहे. संबंधीत अधिका-यांवर कारवाई होण्यासाठी कारावाई होण्याची मागणी करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता आयोजीत करण्यात आलेला विवाह सोहळा चार वाजता संपन्न झाला.