आषाढी एकादशी जवळ आली असतांना महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यावेळी विठ्ठलाची शासकीय महापुजा कोण करणार, विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे की नवे संभाव्य मुख्यमंत्री फडणवीस याबाबत सोशल मिडीयावर चर्चांना पेव फुटले आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय पेच निर्माण झाला असून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात जणू काही राजकीय भुकंप आला असून शिवसेना पक्ष संकटात आला आहे. बंडखोर सोळा आमदारांच्या अपात्रतेविरुद्ध शिंदे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सदर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. आषाढी एकादशीच्या तोंडावर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगादरम्यान आज न्यायालयाच्या निकालानंतर या चर्चेला उधाण आले आहे.
अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या असुन त्या 9 जुलै रोजी पंढरपूरला दाखल होतील. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा कित्येक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडेच आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर आ. अमोल मिटकरींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार असल्याचा ठाम विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारला आपले सरकार वाचवण्यासाठी बहुमत सिद्ध करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर राज्यात नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. नवे सरकार सत्तेवर आल्यास विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान नव्या मुख्यमंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे.