वाई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात मैदानात उतरलेले खा. उदयनराजे भोसले यांनी या लढाईत अन्य सर्वच पक्षांनी सोयीस्कर मौन बाळगल्याचा आरोप करत हा लढा स्वकेंद्री केला आहे. मात्र हे घडत असताना उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पाहता त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपसह सर्वच पक्षातील नेते बुचकळ्यात पडले असून त्यांचा ‘बोलविता धनी’ कुणी अन्य आहे का, अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून सर्वत्र गदारोळ उडाला होता. मात्र सुरुवातीचे दोन दिवस झाल्यानंतर जवळपास सर्वच पक्षांनी या मुद्यावर मौन बाळगले. मात्र दुसरीकडे या विषयावर गेले काही दिवस रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या उदयनराजे यांनी मोहीमच उघडली आहे. आता तर अन्य सर्वांनी मौन बाळगले तरी मी एकटा हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रश्नी सुरुवातीला काही काळ पक्षीय आंदोलन दिसले. मात्र यानंतर काही दिवसातच हा विषय सर्वच पक्षांकडून अडगळीत टाकण्यात आल्याची खंत उदयनराजे यांच्या टीकेतून सध्या व्यक्त होत आहे. उदयनराजे यांनी हा लढा आपल्यासाठी राजकीय नसून तो भाविनक असल्याचे वारंवार जाहीर केले आहे. ते म्हणतात, ‘मी सोडून अन्य कोणीही यावर बोलत नाही. बोलणाऱ्यांवर कारवाई होत नाही. हे निराश करणारे असले तरी मी हतबल झालेलो नाही आणि माझा लढा सुरूच राहणार आहे. कारण मी ‘उदयन भोसले’ हे नाव ‘उदयनराजे’ लावतो आणि स्वत:ला शिवाजी महाराजांचा वंशज समजतो, मग त्यांच्याबद्दल कोणी बोलले तर मी खपवून घेणार नाही.