आधी भाजपाला घातल्या लाथा-आता करताय गोड गोड बाता

आपल्या महाराष्ट्रात वादळी वा-यासह पावसाचा दणदणाट सुरु होतो. यंदा अद्याप मान्सून बरसण्यापूर्वीच 13 जूनला शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे बहुसंख्य बड्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त जाहिरातीने उठलेले राजकीय वादळ अद्याप शांत होण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरुन देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व त्यांच्या लोकप्रियतेसह गायब करण्याच्या खेळात दिल्लीपासून मुंबई, महाराष्ट्रपर्यंत कोण कोण सामील आहे याचा शोध घेण्यात माध्यमकर्मींसह मीडियासम्राट गुंतले आहेत. केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र कधीकाळची लोकप्रिय टॅगलाइन कोणाकोणाला पोटात भाला खुपसावा तशी वेदनादायी वाटू लागली. इथपासून ते फडणवीसांसह महाराष्ट्राच्या भाजपावर कोणकोण नतद्रष्ट हल्ला करतय?  

सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांपेक्षा अकराच महिन्यात कोण उंच उडी मारुन लोकप्रियतेचे  शिखर गाठतयं? कोण यूज अँड थ्रो पॉलिसीचा खेळ करतयं? अशा शेकडो प्रश्नांचा महाराष्ट्रात पाऊस पाडण्यात आला. त्यात माध्यम तज्ञ विश्लेषक यांनी ब्राम्हण – मराठा वादाची नवी खमंग फोडणी घातली. भाजपकडे दमदार मराठा नेता नाही. काँग्रेसमधून आयात केलेले विखे पाटील, विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील (दोन्ही भाजपाचे पण तकलादू वाटणारे) असा तर्क मांडण्यात आला. शिवसेना फोडून किंवा हायजॅक करुन भाजपच्या सोबतीला आलेले एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदी बोळवण करुन फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते. पण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने 40 आमदारांना सूरत, गुवाहाटी, गोवा असे पर्यटन घडवले. नऊ जणांना मंत्रीपद वाटली.

त्यातल्या कथित पाच जणांना भ्रष्टाचार किंवा अकार्यक्षमतेच्या आरोपाखाली डच्चू देण्याची वेळ आली असता शिंदे यांच्या आक्रमक जाहिरातीचे प्रकरण गाजले. भाजप नेते फडणवीस यांची लोकप्रियता शिंदे यांच्यापेक्षा कमी असल्याचे दर्शवत त्यांचे राजकीय अस्तित्व, कर्तृत्व डावलण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून झाल्याचा ओरडा उठला. यातून भाजप शिंदे युतीला फटका बसणार – कार्यकर्त्यांची मने दुभंगली, शिंदे गटाला धडा शिकवावा अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. परंतु या जाहिरातीत “राज्यात शिंदे राष्ट्रात मोदी” अशी नवी टॅगलाइन आल्याने या जाहिरातीस दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळवली होती का? नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह यांच्या संमतीने हे चाललाय का? असा नवा तर्क समोर येताच राज्य भाजपात सन्नाटा पसरला.  

शिंदे गटाची म्हणून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये उधळणारा हा महाभाग कोण? याची चर्चा रंगली. राज्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवणा-या मविआची सत्ता संपवण्यासाठी यावेळी झालेला सत्तांतराचा प्रयोग 50 खोके म्हणून गाजला. त्यामुळे सत्तेवर बसलेल्या काही वजनदार मंत्र्यांना 500 ते दोन –  चार हजार कोटी नोटांचा पर्वत इकडे तिकडे हलवणे सहज शक्य असते  हे लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे पडद्याआड राहून राजकारण्यांना अशा प्रकारचा छुप्या मदतीचा रसद पुरवठा करणारे काळ्या पैशांचा धुमाकूळ घालून दसपट,शंभरपट कशी वसुली करतात तेही जनतेला समजू लागले आहे.

या प्रकरणाचे जास्त पोस्ट मॉर्टम होता कामा नये म्हणून दिल्लीहून पॅचअप करा म्हणून कानपिचक्या येताच राज्यातले भाजपवाले गारठले. देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांच्यासोबत एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवासाचा आणि दिलजमाईचा देखावा केला. एकनाथ शिंदे यांना “शोले ‘तला जय-विरु – फेविकॉलका जोड आठवला. फडणवीसांना शिवसेना शिंदे यांच्यासोबतची 25 वर्षांची मैत्री आठवली. इतकेच नव्हे तर “आमची चिंता करण्याची कुणाला गरज नाही” हे ही त्यांनी सांगितले. फडणवीस खरेच बोलत आहेत. त्यांची आणि त्यांच्या पक्षाची कुणालाच चिंता वाटू नये. फडणवीस यांच्या नावामागे माजी मुख्यमंत्री असे लेबल लागले आहेच.

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. शिवाय भावी मुख्यमंत्र्यांची भली मोठी रांग आहेच. दिल्लीच्या रिमोट कंट्रोलवर सारेच राजकीय पक्ष चालवले जातात. राजकारणात सत्तेची खुर्ची मिळणे हा केवळ संधीचा नव्हे तर पैसा आणि स्वार्थाचा खेळ बनला आहे. “यूज ॲण्ड थ्रो” हाही मंत्र वापरतात. बुद्धिबळाच्या पटावर “किंग”च्या दिशेने पुढे येऊ पाहणा-या सोंगट्या पुढे येण्याआधीच गारद केल्या जातात.

तेच नितीन गडकरी आणि फडणवीस यांच्या बाबतीत घडत आहे, असे काही विश्लेषकांना वाटते  परंतु ते खरे नाही. दिल्ली आणि महाराष्ट्रात हा खेळ सन 1960 पासून चालत आला आहे. मुख्यमंत्रीपद एकदा भोगून झाले तरी काहींना ते पुन्हा पुन्हा हवे असते. अशा सन्मानाच्या पद प्राप्तीसाठी “बोकड बळी” देण्याची प्रथा सांगितली जाते. त्यासाठी नवस बोलले जातात. नवसपूर्तीही धूमधडाक्यात होते. राज्यात आणि देशात कोणीही सर्वोच्च पदावर आले तरी जनतेचा एक वर्ग असा आहे कि जो कायदेकानून नियम, प्रशासन, समाजकारण, धर्मकारणाच्या “पाटा – वरवंटा” या चक्रव्यूहात भरडला जातो. त्याला लुटणारा कधी “गब्बर” असतो. कधी मोगॅम्बो कधी जंजीरचा धर्मा तेजा. जनतेला मात्र “शोले” तल्या जय – विरुची आठवण दिली जाते. आघाडी – युती – ताटातूट – मनोमिलनाची नाटके वठवली जातात. आजचे राजकारण हे चित्रपटातील कथेसारखे झाले आहे. चित्रपटात कालचा व्हिलन कधी हिरो असतो. एखादा हिरो व्हिलन दाखवतात. डाकू आले म्हणून जीव वाचवत धावाधाव करणारी प्रजा तीच असते. म्हणून थोर संत कबीर म्हणतात –

रहीमन धामा प्रेम का मत खीचो

चटकाय टूटने पर ना जुडे

जुडे तो भी गाठ पड जाय. चूक भुल क्षमस्व.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here