प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना अटक

जळगाव : किरकोळ कारणावरुन भाऊ आणि बहिण अशा दोघांवर चॉपरचा वापर करुन प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. कुसुंबा गावातील गणपती नगरात राहणारे करण चंद्रशेखर पाटील आणि चेतन वसंत माळी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

25 डिसेंबर 2023 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावी असलेल्या हॉटेल शिवशाहीच्या मागे अजय सुरेश सोनवणे यांच्या राहत्या घरासमोर करण आणि चेतन हे दोघे विनाकारण आरडाओरड करत होते. त्यावेळी अजय सोनवणे यांनी त्यांना आरडाओरड करु नका असे म्हटले. अजयच्या बोलण्याचा राग आल्याने करण आणि चेतन या दोघांनी अजय सोनवणे यांच्या गळ्यावर चॉपरने वार करुन अश्लिल शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केला. अजयवर होत असलेला हल्ला बघून त्यांची बहिण सपना ही भांडण सोडवण्यासगेली. तिच्या कपाळावर देखील चॉपरने वार करुन तिला जखमी करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चंद्रशेखर पाटील आणि चेतन माळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.      

हल्ला करुन पलायन केलेल्या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरातून ताब्यात घेत अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्यासह पो.नि. जयपाल हिरे, पो.नि. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, सचिन मुढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललीत नारखेडे आदींनी दोघांना ताब्यात घेतले. न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील करण पाटील याच्यविरुद्ध यापुर्वी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here