प्रतिशोधाच्या आगीत राहुल निघाला होरपळून — बापाच्या मारेक-याला ठार केले गोळ्या झाडून

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): सत्तेतून विकासकामाचा ठेका व त्या ठेक्यातून टक्केवारी मिळण्यासाठी राजकीय क्षेत्रातील सत्ताधारी मंडळींची वाटचाल नव्हे तर घौडदौड सुरु असते. सत्ता मिळाल्यानंतर समर्थकांना कामाचा ठेका मिळावा, त्या ठेक्यातून आपल्याला टक्केवारी मिळावी यासाठी सत्ताधारी आणि टक्केवारी दिली म्हणजे त्यात भ्रष्टाचार करण्यास मोकळे रान मिळावे यासाठी समर्थक ठेकेदार असे दोघेही प्रयत्नशील असतात. प्रतिस्पर्धी उमेदवारास सत्ता मिळाली म्हणजे त्याला खाली खेचण्यासाठी विरोधक काहीही करण्यास तयार असतात. प्रसंगी त्यांच्या अंगी गुन्हेगारी वृत्ती देखील संचारते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा प्रकार खुलेआम दिसतो. अगदी गावातील ग्रामपंचायतीच्या राजकारणात देखील गुन्हेगारीने आपले जाळे पुर्णपणे पसरवले आहे. त्यातून खूनासारखी एखादी अप्रिय घटना घडते.

चौदा वर्षापुर्वी गावाची सत्ता आणि गावातील पाण्याच्या टाकीच्या अपुर्ण बांधकामाच्या प्रश्नावरुन तत्कालीन सरपंच आणि प्रतिस्पर्धी गटात वाद झाला होता. या वादातून सन 2011 मधे त्यावेळी सरपंचाची हत्या झाली होती. या हत्येचा वाद न्यायालयात निकाली निघाला. सर्व मारेकरी सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटले आणि जेलमधून बाहेर आले. आपल्या बापाच्या खूनाचा बदला म्हणून मुलाने मारेक-याची चौदा वर्षानंतर गोळ्या झाडून हत्या केली. खून का बदला खून अशी फिल्मी स्टाईल हत्या 22 एप्रिलच्या रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यात घडली. धरणगाव तालुक्यातील सन 2011 च्या आणि आता सन 2025 च्या घटनेचा लेखाजोखा पुढीलप्रमाणे.

साधारण सन 2004 चा तो काळ असावा. या काळात धरणगाव तालुक्यातील वाकटूकी या गावी ज्ञानेश्वर शंकर सावंत हा उमदा तरुण रहात होता. ऐन तारुण्याचा काळात ज्ञानेश्वर सावंत (कोळी) हा तरुण वाकटुकी गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झाला. सरपंचपदाची माळ त्याच्या गळ्यात पडली. अंगी तारुण्याचा जोश असलेला ज्ञानेश्वर वाकटूकी गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्याने त्याचा जल्लोषात सत्कार झाला. त्याच्या घरी उत्साहाचे वातावरण होते. सरपंच असलेल्या ज्ञानेश्वर सावंत याच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम मजुर झाले. पाण्याच्या टाकीमुळे गावक-यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार होता. मात्र काही कारणास्तव ते काम रखडले. ते बांधकाम अपुर्ण राहिले.

mayat gopal malache

त्यानंतर साधारण सात ते आठ वर्षाचा कालावधी भरकन निघून गेला. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपुर्णच राहिले. दरम्यानच्या कालावधीत ज्ञानेश्वर यास ठाणे महानगरपालिकेत चालक पदावर नोकरी मिळाली. त्यामुळे आपल्या जीवनाची नव्याने सुरुवात करण्यासाठी ज्ञानेश्वरने ठाणे महानगर पालिकेत चालक पदाची नोकरी स्विकारली. मोठ्या मुलाला अंजनविहीरे या गावी दहावीचे शिक्षण घेण्यासाठी गावाकडेच ठेऊन त्याने पत्नी व लहान मुलगा अशा दोघांना  सोबत घेत पनवेल गाठले. तो पत्नी व लहान मुलगा यांच्यासह पनवेल येथे राहू लागला आणि ठाणे मनपात चालकाची नोकरी करु लागला. दिवसामागून दिवस जात होते. काळ पुढे पुढे सरकत होता. मात्र त्याच्या वाकटुकी गावातील सरपंच पदाच्या कालावधीतील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपुर्णच राहिले होते.

त्यानंतर काळ बदलला. ग्रामपंचायतीच्या राजकारणात सत्तापालट झाला. ज्ञानेश्वर सावंत याच्या काळातील समिती बदलली. मधुकर अर्जुन कोळी याच्या अधिपत्याखाली नविन समिती गठीत झाली. ज्ञानेश्वर कोळी याच्या कार्यकाळातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपुर्ण असल्याने नव्याने गठीत झालेली समिती त्याच्यावर नाराज होती. ज्ञानेश्वर (सावंत) कोळी ठाणे येथून गावी वाकटुकी येथे आला म्हणजे नव्या समितीचे सदस्य त्याच्याशी वाद घालत होते. बघता बघता सन 2011 चा काळ सुरु झाला.

ज्ञानेश्वर कोळी याने त्याच्या सरपंच पदाच्या कार्यकाळातील पाण्याच्या टाकीचे अपुर्ण बांधकाम पुर्ण करुन द्यावे यासाठी त्याच्यामागे तगादा सुरु होता. ज्ञानेश्वर कोळी आणि मधुकर कोळी यांच्यात पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरुन संघर्ष सुरु होता. दोघांमधील वाद शिगेला पोहोचला होता. ज्ञानेश्वर सांवत (कोळी) हा पाण्याच्या टाकीचे काम करुन देण्यास तयार होता. मात्र पाण्याच्या टाकीच्या कामाचा ठेका आपल्याला मिळावा असा सरपंच मधुकर कोळी, उप सरपंच गोपाळ सोमा भिल आणि त्यांच्या समर्थकांचा सुर होता असे म्हटले जाते. एकंदरीत या विषयावरुन दोन गटातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नव्हती.

20 सप्टेबर 2011 रोजी माजी सरपंच ज्ञानेश्वर सावंत हा पत्नी आणि लहान मुलासह वाकटुकी गावी सुटीवर आला होता. आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याचा आणि विद्यमान सरपंच मधुकर कोळी, उप सरपंच गोपाल भिल यांच्यात वादाची ठिणगी पडली. 21 सप्टेबर 2011 रोजी पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची कागदपत्रे घेऊन ज्ञानेश्वर सावंत, मधुकर अर्जुन कोळी आणि उप सरपंच गोपाळ सोमा भिल असे सर्वजण जळगाव येथे गेले. रात्रीचा एक वाजला तरी देखील ज्ञानेश्वर घरी आला नाही. त्यामुळे साहजीकच त्याची पत्नी काळजीत पडली. तिने पती ज्ञानेश्वर यास फोन करुन तो कुठे आहे याची विचारणा केली. त्यावेळी तिला पती ज्ञानेश्वर आणि मधुकर कोळी व गोपाल भिल यांच्यात जोरजोरात वाद सुरु असल्याचे ऐकू आले. त्यामुळे तिने लहान दिर नामदेव यास त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले. त्या रात्री नामदेव याने त्याच्या निवडक नातेवाईकांसह ज्ञानेश्वरचा शोध घेत त्याला सुखरुप घरी परत आणले.

दुस-या दिवशी 22 सप्टेबर 2011 रोजी भल्या पहाटे या वादातून ज्ञानेश्वर सावंत याच्या खूनाची घटना घडली. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर हा घरानजीक एका टपरीजवळ उभा होता. त्याच वेळी बाहेर मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली. आवाजाच्या दिशेने ज्ञानेश्वरच्या घरातील सर्व सदस्य बाहेर पळत आले. त्यावेळी तत्कालीन उपसरपंच गोपाल सोमा भिल यांच्यासह श्रीराम सोमा भिल, विनोद सोमा भिल, मुलचंद आत्माराम भिल, दिलीप भिल, सोमा बुधा भिल असे सामुहिकपणे उभे होते. गोपाळच्या हातात सुरीसारखे हत्यार तर श्रीरामच्या हातामध्ये बल्लम होता. इतर सर्वांच्या हातात काठ्या होत्या. पाण्याच्या टाकीचे काम आम्हीच करु असे आम्हाला मधुकर कोळी याने सांगितले असल्याचे सर्वजण ज्ञानेश्वर यास सांगून जीवे मारण्याचा दम देत होते.

श्रीराम व विनोद या दोघांनी ज्ञानेश्वरला पकडून ठेवले आणि त्याच वेळी गोपाल सोमा भिल याने ज्ञानेश्वरच्या छातीवर सुरीसारख्या हत्याराने वार केले. ज्ञानेश्वर याच्यावरील जीवघेणा हल्ला रोखण्यासाठी त्याचे वडील, बहीण व भाऊ असे सर्वजण त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्यावेळी विनोद कोळी याने त्यांच्यावर काठीने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात ज्ञानेश्वर मात्र जीवानिशी गेला. ज्ञानेश्वरच्या मृत्युप्रकरणी त्याचा लहान भाऊ नामदेव उर्फ तानकु शंकर सावंत (कोळी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यावेळी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाच गुन्हा दाखल करण्यात आला. मधुकर अर्जुन कोळी, गोपाल सोमा भिल (मालचे), श्रीराम सोमा भिल, विनोद सोमा भिल, मुलचंद आत्माराम भिल, दिलीप महारु भिल, सोमा बुधा भिल अशा सर्व संशयितांविरुद्ध हा गुन्हा गु.र.नं. 189/2011 भा.द.वि. 302, 324, 143, 147, 148, 149, 323, 504 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास धरणगाव  पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक (सध्या माहुर जिल्हा नांदेड उप विभागाचे डिवायएसपी) सिनगारे यांनी सुरु केला होता. 30 नोव्हेंबर 2011 रोजी या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 4 मे 2013 रोजी या खून खटल्याचा निकाल लागला. हा गुन्हा नाशाबीत झाला. सबळ पुराव्या अभावी या गुन्ह्यातील सर्व संशयीत निर्दोष होत गुन्ह्यातून बाहेर आले.

आपला बाप ज्ञानेश्वर सावंत याला जीवानिशी ठार करणारा तत्कालीन उप सरपंच गोपाळ सोमा भिल (मालचे) हा निर्दोषमुक्त झाल्याचा राग राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) याच्या मनात निर्माण झाला. गुन्हा घडला त्यावेळी राहुल वयाने लहान होता. मात्र जसजसा तो तरुण होत गेला तसतसा त्याच्या मनातील गोपाळ भिल (मालचे) याच्याविषयीचा राग उफाळत गेला.  दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. काळ झपाट्याने पुढे जात होता. ज्ञानेश्वरचा मुलगा राहुल आता तरुण झाला होता. राहुलच्या मनात आपल्याविषयी राग असल्याची कुणकुण गोपाल मालचे (भिल) यास लागली होती. तो कधीही आपल्याला एकट्यात गाठू शकतो हे गोपाल जाणून होता. त्यामुळे गोपाल मालचे व त्याचा भाऊ विनोद सोमा मालचे हे दोघे भाऊ आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील कळमडू या गावी राहण्यास निघून गेले होते. मात्र धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे मालचे परिवाराची शेती असल्यामुळे त्यांना कामानिमीत्त वाकटुकी येथे येणे चुकत नव्हते. गेल्या तेरा वर्षापासून गोपाल मालचे आणि विनोद मालचे या दोघा भावांचा परिवार चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे रहात होता. 

शेतीची कामे पुर्ण होत नसल्याने गोपाल सोमा मालचे हा गेल्या एक महिन्यापासून त्याच्या परिवारासह वाकटुकी ऐवजी धरणगाव शहरात भाड्याने राहण्यास आला होता. तो दररोज धरणगाव – वाकटुकी दरम्यान प्रवास करुन शेतीची कामे बघत होता. अखेर बरोबर चौदा वर्षांनी गोपाल यास राहुलच्या रुपात काळाने गाठले. राहुलचे वडील ज्ञानेश्वर यांचा खून झाला ती तारीख 22 होती. ज्ञानेश्वर सावंत यांचा मारेकरी गोपाल यास काळरुपी राहुलने गाठले ती तारीख देखील 22 निघाली.

22 एप्रिल 2025 हा गोपालच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. या दिवशी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास विहीर फाट्यानजीक गोपाल मालचे हा एकटा उभा होता. त्या ठिकाणी गोपाल एकटाच आपल्या तावडीत सापडल्याचे बघून राहुलसह वाकटुकी गावातील त्याचे सहा ते सात साथीदार त्याच्या सांगण्यावरुन सामुहिकपणे एकत्र आले. आपल्या मागावर आपल्या जीवावर उठण्यासाठी राहुल आणि त्याचे साथीदार उभे असल्यामुळे गोपाल मनातून घाबरला. चौदा वर्षापुर्वी राहुलचे वडील ज्ञानेश्वर सावंत याच्यावर धारदार शस्त्राचे घाव घालतांना गोपालचे हात थरथरले नव्हते. मात्र आज आपल्या समोर आपल्याला मारण्यासाठी उभा असलेला समुह बघून गोपालचे हात थरथर कापू लागले.

गोपालने भयभीत होत घरी पत्नीला फोन करुन घटनेची कल्पना दिली. त्यावेळी त्याला पत्नीने पलीकडून फोनवर सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी थांबू नका. मी खामखेडा येथे निघून जातो असे गोपालने फोनवर पत्नीला सांगितले. गोपाल एकटाच त्याच्या ताब्यातील कारने जात असल्याचे बघून राहुलने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. त्याची गाडी अडवून त्याला बाहेर येण्यास भाग पाडले. गोपाल बाहेर येताच राहुलने आपल्या ताब्यातील गावठी कट्ट्याने गोपालच्या कपाळावर निशाना साधला.

गावठी पिस्टलचे सलग दोन ते तिन फायर झाल्याने गोपाळ त्याच्या कारजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला. चौदा वर्षापुर्वी ज्ञानेश्वरचा खून करणारा आज त्याच्याच मुलाच्या हातून रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडला होता. ज्या दिवशी ज्ञानेश्वरचा मृत्यु झाला ती तारीख 22 सप्टेबर 2011 आणि वेळ सकाळची होती. राहुलच्या हातून त्याच्या वडीलांची हत्या करणारा गोपाल याचा खून झाला ती तारीख देखील 22 होती. मात्र महिना आणि वेळ यात फरक होता.

गोपलची हत्या केल्यानंतर राहुल स्वत:हून धरणगाव पोलिस स्टेशनला हजर झाला. घडलेली घटना आणि गुन्हा त्याने कबुल केला. आपण गोपालची हत्या का केली याचा देखील त्याने खुलासा केला. आपल्या बापाचा मारेकरी खून खटल्यातून निर्दोष सुटल्याचा राग मनात ठेवत आपण हा खून केल्याचे त्याने कबुल केले. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्यायदेवता फक्त सबळ पुरावे बघते. या सबळ पुराव्या अभावी राहुलचे वडील ज्ञानेश्वर यांचा मुख्य मारेकरी आणी त्याचे सर्व साथीदार निर्दोष सुटून बाहेर आले होते. 

घटनेची माहिती समजताच धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक निलेश नानाजी वाघ, हे.कॉ. महेंद्र बागुल, नितीन पाटील, राजेंद्र कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईसह तपास सुरु केला. मयत गोपाल सोमा मालचे याचा भाऊ विनोद सोमा मालचे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला संशयीत राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 153/25 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 (1), शस्त्र अधिनियम 3, 25 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here